Breaking News LIVE | भारतीय वंशाचे मेक्सिकोचे कृषीतज्ज्ञ आणि 'वर्ल्ड फूड प्राईज'चे विजेते डॉ.संजय राजाराम यांचं निधन

Breaking News LIVE Updates, 18 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Feb 2021 10:21 PM
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण : उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 65 संचालकांना दिलासा, सहकार विभागाच्या अहवालात अजित पवार यांच्यासह 65 संचालकांना क्लीन चीट, यापूर्वी एसआयटीनेही अजित पवार यांच्यासह राज्य सहकारी बँकेवरील 75 जणांना क्लीन चीट दिली होती. आता सहकार विभागाच्या अहवालातही अजित पवारांना क्लीन चीट मिळाल्याची माहिती, फेब्रुवारी 2020 मध्ये निवृत्त जिल्हा न्यायाधीश पंडितराव जाधव यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. हा चौकशी अहवाल सहकार आयुक्तांना सादर करण्यात आला असून अजित पवारांसह 65 संचालकांना क्लीन चीटस देण्यात आली आहे.
विजांच्या कडकडाटासह ठाण्यात जोरात पाऊस.
भारतीय वंशाचे मेक्सिकोचे कृषीतज्ज्ञ आणि 'वर्ल्ड फूड प्राईज'चे विजेते डॉ.संजय राजाराम यांचं निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. जगातील गव्हाचं उत्पादन तब्बल 200 दशलक्ष टनने वाढवण्यात डॉ. संजय राजाराम यांचं मोलाचं योगदान होतं. डॉ. संजय राजाराम यांनी 480 जातींची वाण तयार केली आहेत. या वाणांचा वापर 51 देशांमधील लहान-मोठ्या शेतकऱ्यांनी केला.
शिवजयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या डिस्को रोषणाई वरून खासदार संभाजीराजे यांनी ट्विट करून पुरातत्व खात्याला फटकारले आहे. या विषयावर सविस्तर भूमिका मांडण्यासाठी उद्या (19 फेब्रुवारी) रोजी शिवनेरी किल्ल्यावर पत्रकार परिषद घेऊन पत्रकार बांधवांशी संवाद साधणार आहेत.
औरंगाबाद वैजापूर तालुक्यातील विरगाव, मस्की गावात वादळी वाऱ्यासह पाऊस. तर लोणी खुर्द गावात वादळी वार्‍यांसह गारांच्या पावसाला सुरुवात झाली आहे.
आज पुण्यात 841 कोरोना रुग्णांची नोंद तर 9 रुग्णांचा मृत्यू
पनवेल, कामोठे विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी, काही भागात गारांचा पाऊस
कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील जोगेवाडी धनगरवाड्यावर हिमवर्षाव
झाला. धनगर वाड्यावरील नागरिक भयभीत झाले असून 20 बकऱ्या जखमी झाल्या आहेत. वासनोलीपैकी जोगेवाडी धनगरवाड्याला सुमारे एक तास झालेल्या गारांच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पाढंर्‍या शुभ्र पडलेल्या गारांच्या सड्यामुळे काश्मीरमध्ये बर्फ पडल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. सुमारे एक तास झालेल्या गारांच्या वर्षावाने धनगरवाड्यावरील नागरिकांची पळता भुई थोडी झाली.
बुलढाणा : जिल्ह्यात आज नवीन 134 रुग्ण सापडले आहेत. आज 66 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 15 हजार 359 कोरोनाबाधित आहेत. आजपर्यंत 14 हजार 329 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आज 849 रुग्णांवर रुग्णासयात उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण 181 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषयीचे सुरक्षा नियम नीट पाळले नाहीत तर पुन्हा ऑनलाईन सुनावणी सुरु करु, मुंबईत कोविड 19 चा वाढता प्रभाव पाहता हायकोर्टातील न्यायमूर्तींचा गर्भित इशारा
टूल किट प्रकरणातील शंतनु दिशा आणि निकिता जेकब यांच्या समर्थनार्थ आज ठाण्यात एक मूक आंदोलन करण्यात आले. ठाण्यातील पर्यावरणवादी तरुणांनी एकत्र येऊन केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या विरोधात निषेध नोंदवला. दिशा शंतनु आणि निकिता यांना लवकरात लवकर सोडून देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. हाताला दोरखंड बांधून, तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून त्यांनी हे आंदोलन केले.
महाबळेश्वर वाईमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ. महाबळेश्वरमध्ये गारांचा पाऊस पडल्याने स्ट्रॉबेरीसह असंख्य शेतीचे नुकसान. शेतकरी चिंतेत.
मुंबईत कोरोनाबाधित, होम क्वॉरन्टीन व्यक्ती फिरताना आढळल्यास थेट एफआरआर दाखल करणार, लोकलच्या तीनही मार्गांवर 300 मार्शल तैनात करणार, मुंबईत लग्न कार्यालये, क्लब, रेस्टॉरंट्सवर धाडसत्र सुरु करणार, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाचा मेगाप्लॅन
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीए आयुक्त
आर ए राजीव यांची तक्रार केली आहे. गोपनीयतेचा भंग करुन शासकीय माहिती माध्यमांना पुरवल्याबद्दल सरनाईक यांनी राजीव यांच्यावर आक्षेप घेत आहे. आर ए राजीव यांनी ईडीच्या चौकशीनंतर माध्यामांशी संवाद साधला होता. 16 फेब्रुवारीला एमएमआरडीए आयुक्त आर ए राजीव यांना ईडीनं चौकशीसाठी बोलवलं होतं. टॉप सिक्युरिटी प्रकरणात राजीव यांची चौकशी झाली होती.
वाशिम : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव जोडल्यानंतर संजय राठोड आपली भूमिका मांडण्यासाठी आज पोहरादेवी येणार होते. मात्र, ते आज येऊ शकले नाही. सर्वात प्रथम एबीपी माझाने संजय राठोड येणार नसल्याचं वृत्त दिल होत आणि आज बैठक होणार असल्याचे सांगितलं होतं. बैठकीत बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज जितेंद्र महाराज, कबिरदास महाराज, सुनील महाराजांसह इतर समाजाचे नेते बैठकीत उपस्थित.
वर्धा :
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश


, 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

, लग्न व इतर कार्यक्रमासाठी 50 व्यक्तींचे बंधन

, औषधी दुकाने व रुग्णालये सोडून इतर दुकाने व बाजारपेठा सायंकाळी 7 पर्यंत सुरू
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज डहाणू मध्ये रेल रोकोचा इशारा देण्यात आला आहे सध्या या मोर्चाला सुरुवात झाली असून पोलिसांनी हा मोर्चा डहाणू रेल्वे स्टेशन च्या गेट वर अडवला असून काही वेळ पोलीस आणि आंदोलन यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता मात्र सध्या पोलिस आणि आंदोलक यांच्यात चर्चा सुरू असून आंदोलक रेल रोको करण्यावर ठाम आहे
पुजा चव्हाणचा मृत्यू पुण्यातील ज्या वानवडी पोलिस स्टेशनमध्ये नोंद आहे त्या पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक लगड यांनी या प्रकरणात अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही असं सांगितलंय. त्याचबरोबर या विभागाच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी देखील या प्रकरणात अरुण राठोड किंवा इतर कोणाला ताब्यात घेतलेले नाही अशी माहिती दिलीय. काल देखील या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी कोणाला ताब्यात घेतलेले नाही अशीच माहिती दिली होती.
औरंगाबाद लासुर स्टेशनवर लाल बावटा संघटनेकडून रेल रोको आंदोलन
,
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ करणार रेल रोको
,
रेलरोकोसाठी लाल बावटा संघटनेचे कार्यकर्ते स्टेशनवर दाखल
,
संयुक्त किसान मोर्चाने दिलीय देशव्यापी आंदोलनाची हाक

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे कोरोना पॉझिटिव्ह, काल रात्री अचानक प्रकृती बिघडली असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
औरंगाबादच्या ग्रामीण भागामध्ये काल संध्याकाळी आणि आज सकाळच्या दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली .सोयगाव तालुक्यात काही ठिकाणी गारपीटही झाली. या गारपिटीमुळे आंब्याला आलेला मोहर गळून पडलाय तर फळबागांचे देखील नुकसान झाले.
अकोला, अमरावती आणि यवतमाळ या शहरात लॉकडाऊन होण्याची शक्यता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची चर्चा
पश्चिम बंगालच्या राज्यमंत्र्यांवर बॉम्बहल्ला, राज्यमंत्री झाकीर हुसेन जखमी, गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्याआधी घटना

भंडारा : भविष्यात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, तसेच प्रदर्शित होऊ देणार नाही. मनमोहन सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार टि्वटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते मात्र आता त्यांना देखील विसर पडला आहे, असं त्यांनी म्हटलंय.
रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात देखील पहाटेच्या वेळी अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्याच्या दक्षिण भागात असलेल्या साखरपा आणि देवरूख या भागात रात्री तीन ते चार वाजताच्या दरम्यान पावसाच्या जोरदार सरी बसरल्या. अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा आणि काजू या प्रमुख पिकांवर परिणाम होणार आहे. सध्या जिल्ह्याच्या वातावरणाचा विचार करता काही भागात काहीसं ढगाळ वातावरण आहे.
अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.. काल जिल्ह्यात 498 कोरोनाचे रुग्ण सापडले तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे.. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर जिल्ह्यात कोरोनाची पुर्ववत परिस्थिती निर्माण होऊन पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय प्रशासनाला पर्याय राहणार नाही.. अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व आस्थापना, हॉटेल्स, खाद्यगृहे, रेस्टॉरेंट, बार, लग्न समारंभ, सर्व प्रकारची दुकाने आदींसाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार रात्रीपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महसूल आणि मनपा प्रशासनाव्दारे विशेष पथके गठीत करण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश पथकांना देण्यात आले आहे. कोविड प्रतिबंधात्मक आदेशाचे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे...
मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 721 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी कोरोनामुळे तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत आतापर्यंत मृतांचा आकडा 11428 आहे.
सांगलीची शान असलेल्या आयर्विन पुलावरची वाहतूक 23 फेब्रुवारी पासून एक महिन्यासाठी बंद करण्यात येणार आहे..आयर्विन पुलाची डागडुजी करण्यासाठी पुलावरील वाहतूक बंद करून ती सांगली बायपास मार्गावरून वळवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.सध्या आयर्विन पुलावरून अवजड वाहतूक सोडून अन्य वाहतूक सुरू आहे.हीच वाहतूक 23 फेब्रुवारी पासून 24 मार्च पर्यत बंद ठेवण्यात येणार आहे
रायगड-

मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात बस व ट्रकचा अपघात... मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर दोन बस व एका ट्रकचा अपघात... खोपोली हद्दीमध्ये फुडमॉलजवळ अपघात, प्रवासी किरकोळ जखमी..

पार्श्वभूमी

राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वाद पुन्हा पेटण्याची शक्यता


 


राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा वाद आता काही नवीन राहिलेला नाही. असाच वाद पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता आहे. यावेळी निमित्त आहे, विधानसभा अध्यक्षपदाचं. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष होते. काँग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. त्या पदाचा कार्यभार सध्या नरहरी झिरवळ यांच्याकडे आहे. 1 मार्च रोजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधी राज्यपालांनी थेट राज्य सरकारला थेट पत्र लिहिले आणि पत्रातून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी होणार ही विचारणा केली आहे.


 


मंत्री शिवसेनेचा, पाठीशी राष्ट्रवादी; अजित पवार आणि नवाब मलिकांकडून संजय राठोड यांची पाठराखण


 


पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. संजय राठोड यांच्या ओडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून संजय राठोड नॉट रिचेबल झाले आहेत. पण राठोड आमच्या संपर्कात असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांनी मीडियावर खापर फोडत राठोड यांचा बचाव केला. पूजा चव्हाण प्रकरणात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलेल्या पाठराखणीने शिवसेना मंत्र्यांची अडचण झालीय कारण एकीकडे राठोड प्रकरणात शिवसेना मंत्री चिडीचूप असताना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी राठोड यांची पाठराखण केली.


 


राज्यात 4787 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत गेल्या दोन महिन्यातील सर्वाधिक वाढ


 


राज्यात कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. आज राज्यभरात 4 हजार 787 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 20 लाख 76 हजार 093 झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 2.49 टक्के एवढा आहे. आज 3853 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आजपर्यंत एकूण 19 लाख 85 हजार 261 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95.62 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 1 लाख 95 हजार 704 जणांना होमक्वॉरन्टीन असून 1664 जण इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टीनमध्ये आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.