Breaking News LIVE : मुंबईत लॉकडाऊनच्या भितीने परप्रांतीय मजुरांची कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसवर गावी जाण्यासाठी तुफान गर्दी

Breaking News LIVE Updates, 11 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Apr 2021 07:18 AM
मुंबईत लॉकडाऊनच्या भितीने परप्रांतीय मजुरांची कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसवर गावी जाण्यासाठी तुफान गर्दी

मुंबईत लॉकडाऊनच्या भितीने परप्रांतीय मजुरांची कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसवर गावी जाण्यासाठी तुफान गर्दी 

आज राज्यात 63,294 नवीन रुग्णांचे निदान

आज राज्यात 63,294 नवीन रुग्णांचे निदान, 34,008 रुग्णांना आज डिस्चार्ज 

कोल्हापूर शहरात पावसाच्या जोरदार सरी

कोल्हापूर शहरात पावसाच्या जोरदार सरी. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा. शहरातील अनेक भागात विजेचा पुरवठा खंडित.

नागपूर : शेतात विजेचा धक्का लागल्याने दोन महिला मजूर ठार

नागपूर : शेतात विजेचा धक्का लागल्याने दोन महिला मजूर ठार, नरखेड तालुक्यातील खलानगोंदी शिवारातील घटना, भुईमूग पिकाच्या रक्षणासाठी शेतकरी नानाजी बेले यांनी 12 एकर शेतीच्या कंपाऊंडला करंट लावला होता, करंट न काढल्याने घडली घटना..

शरद पवार ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल

शरद पवार यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया 12 एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी आज ते ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले आहेत.  

सिंधुदुर्ग : कणकवली पोलिसांची अवैद्य दारू वाहतुकीवर धड़क कारवाई, 9 लाखाची दारू जप्त

मुंबई गोवा महामार्गावर कणकवली पोलिसांनी ओसरगाव टोलनाक्यावर गोवा बनावटीची अवैद्य दारू पकडली. गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकमधून ८ लाख ८८ हजार २०० रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू कणकवली पोलिसांनी पकडली. तर ७ लाखाच्या ट्रकसह एकूण १५ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या गोवा बनावटीची अवैद्य दारू मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. 

उस्मानाबाद - आर्थिक अडचणीला कंटाळून सांजा गावातील केशकर्तन दुकानदाराची आत्महत्या
उस्मानाबाद - आर्थिक अडचणीला कंटाळून सांजा या गावातील केशकर्तन दुकानदाराची विष घेऊन आत्महत्या,

 

आमची दुकाने बंद आहेत , सरकारचा चुकीचा निर्णय आहे , माझ्या लहान लेकरांचे मी 5 हजार रुपयात कसे भागवायचे असा आत्महत्या करण्यापूर्वी चिट्ठीत उल्लेख,

 

मनोज दगडू झेंडे वय 45 वर्ष असे आत्महत्या केलेल्या कटिंग दुकानदाराचे नाव , विष घेऊन केली आत्महत्या,

 

उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करताना मृत्यू,

 

त्यांच्या पश्चात 2 मुले व एक मुलगी, पत्नी असा परिवार

 
उस्मानााबाद शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस

उस्मानााबाद शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस

टीआरपी घोटाळ्यातही सचिन वाझे यांचं नाव : सूत्र

मुंबई : टीआरपी घोटाळ्यातही सचिन वाझे यांचं नाव समोर आलं आहे. 30 लाख रुपये लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला असून ईडीकडून सचिन वाझे यांच्या व्यवहारांची चौकशी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती सुत्रांकडून मिळत आहे. 

जयंत पाटील यांची संभाजी भिंडेच्या वक्तव्यावर टीका

संभाजी भिंडेंचे वक्तव्य हे निषेधार्ह असल्याचं राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलंय. सरकार कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत असताना अशी विधाने ही कोरोनला आळा घालण्यासाठी बाधा ठरत आहेत. तसेच मोहन भागवत आणि देवेंद्र फडवणीस याना कोरोना झाला होता अशीही कोपरखळी त्यांनी मारली. 

यवतमाळ जिल्ह्यात 12 हजार लसीचे डोस दाखल 

अमरावती विभागातून फक्त यवतमाळला कोरोना लसीचे 12 हजार डोस मिळाले आहेत. दोन दिवस पुरेल एवढा लस साठा उपलब्ध झाला असून उद्या आणखी लस साठा मिळण्याची शक्यता आहे. शनिवारी कोरोना प्रतिबंधित लस संपल्याने लसीकरण ठप्प झाले होते. आज अकोला येथून ही लस प्राप्त झाली आहे

कोरोना नियोजनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथक चंद्रपुरात दाखल

कोरोना नियोजनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथक चंद्रपुरात दाखल झालं आहे. प्रशासनाची आढावा बैठक घेत आरटीपीसीआर तपासण्या व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश या पथकाने दिले आहेत. केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील लसीकरण केंद्राची पाहणी केली असून आवश्यक त्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. 

कल्याणमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन 

कोविडच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने राज्य सरकारने रक्तदान करा असे आवाहन नागरिकांना केलेय.याच आवाहनाला साथ देत कल्याण डोंबिवली मधील निर्भय जर्नलिसीट असोसिएशन आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात कल्याण डोंबिवली मधील पत्रकारांनी आणि केडीएमसीच्या सुरक्षा रक्षकांनी रक्तदान करुन शिबिराला सुरुवात केली

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, दोन स्वीय सहाय्यकांना सीबीआयचं समन्स

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना 10 कोटी रुपयांची खंडणी वसुल करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना सीबीआयनं समन्स बजावलं असून अनिल देशमुख यांचीही सीबीआय चौकशी होण्याची शक्यता आहे. 

वाशिम : चारित्र्यावर संशय घेत विवाहितेची पतीकडून हत्या, पोलिसांकडून अटक

वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील मानोली इथं चारित्र्यावर संशय घेत अवघ्या 9 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहीतेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेवर लोखंडी पाईपाने डोक्यावर, डोळ्यावर, गळ्यावर मारहाण केली. तिचे डोके फरशीवर आदळून जिवे मारल्याची घटना काल दुपारची आहे. पती रोशन उगले आपली पत्नी  रिनाला  नेहमी त्रास देत होता. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेवून छळ करत होता. या छोट्या वादाचं रूपांतर मोठं होत गेलं आणि पत्नीची हत्या केली दरम्यान आरोपी मानसिक रुग्ण असल्याची माहिती कळत असून आरोपी रोशन यास मंगरूळपीर पोलिसांनी अटक केली आहे. 

डोंबिवलीत गुढिपाडव्याला होणारी नववर्ष स्वागत यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द

डोंबिवली : गुढिपाडव्याला राज्यात सर्वच ठिकाणी नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते. याच स्वागत यात्रेची सुरवात डोंबिवली मधून झाली असंही म्हटलं जातं. स्वागतयात्रेचा वसा पुढे नेणारी डोंबिवली मुळात या गोष्टीसाठीच जास्त ओळखली जाते. पण, यंदा मात्र उत्सवाच्या उत्साहावर कोरोनाच्या संसर्गानं विरझण टाकलं आहे. डोंबिवलीमधील प्रसिद्ध श्री.गणेश मंदिर संस्थान यांच्या वतीनं दरवर्षी स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात येतं. मात्र कोरोनामुळे मागच्या वर्षी या शृंखलेमध्ये खंड पडला. त्यावेळी पुढच्या वर्षी नव्या उत्साहात  स्वागतयात्रा आयोजित करण्यात येईल असं सांगण्यातही आलं. पण, परिस्थिती काहीशी सुधरतेय असं दिसून आलं आणि पुन्हा एकदा कोरोनामुळं जीवनाची घडी विस्कटली. ज्यामुळं यंदाच्या वर्षीही डोंबिवली येथील नववर्ष स्वागत यात्रा रद्द करण्यात आली आहे.

नाशिक : शिवसेना नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनाने निधन

नाशिक : शिवसेना नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनाने निधन झालं असून गेल्या काही दिवसांपासून खाजगी रुग्णलयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. चार वेळा निवडून आलेल्या कल्पना पांडे यांनी 2 वेळा सिडको प्रभाग सभापती पद ही सांभाळले होते. मनपाच्या विविध विषय समित्यांवर त्यांनी काम केलं होतं. 

गुजरात राज्यात महाराष्ट्रातून येणाऱ्या खासगी लक्झरी बसेसला बंदी; प्रवाशांना रस्त्यावर उतरवले

महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गुजरात राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातून येणाऱ्या खासगी लक्झरी बसेसला गुजरात राज्यात प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे नवापूर सीमा तपासणी नाक्यावर 30 ते 40 बसेस मध्य रात्रीपासून उभ्या आहेत. प्रवाशांना प्रचंड हाल होत सहन करावे लागत आहेत. महाराष्ट्रातील खानदेश विदर्भ भागातील मोठ्या संख्येने प्रवाशी सुरत येथे पायपीट करून जात आहेत. 

नाशिक : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरावर अन्न आणि औषध प्रशासनाची नजर

नाशिक : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरावर अन्न आणि औषध प्रशासनाची नजर राहणार असून यासंदर्भातील सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. रेमडेसिवीर औषधांचा अनियंत्रित वापर, साठेबाजी, काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. रुग्णालयं, होलसेल विक्रेते यांच्या रेमडेसिवीर व्यवहारावर अन्न आणि औषध प्रशासनाची नजर असणार आहे. होलसेल विक्रेत्यांमार्फत थेट रुग्णलायांना रेमडेसिवीरचा पुरवठा होणार आहे. रुग्णलयांना लागणारा रोजचा इंजेक्शन पुरवठा, मागणी याचा दैनंदिन अहवाल ठेवणं अन्न औषध प्रशासन विभागाला बंधनकारक असणार आहे. 

उस्मानाबाद : शनिवारी  558 कोरोना बाधित रुग्णांची नोंद

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. शनिवारी  558 कोरोना बाधित आढळले आहेत. 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. आज उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 309 , कळंब 58 , उमरगा 44 , तुळजापूर 44 , वाशी 21 , लोहारा 16 भूम 33 तर परंडा तालुक्यात 33 रुग्ण आढळले आहेत. आज दिवसभरात 251 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे 81.45 एवढे आहे. आज 7 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 2.53 टक्के एवढा आहे.

वाशिम जिल्ह्यात विजेच्या गडगडाटासह पाऊस

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात रात्री 10 वाजल्यापासून विजेच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा जरी निर्माण झाला असला तरी मात्र हा अवकाळी जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यसाठी धोकादायक ठरणार आहे. कारण या वतावरणामुळे कोरोना संक्रमण धोका वाढण्याची शक्यता आहे. हा पाऊस शेतीला काही प्रमाणात नुकसान करणारा आहे. आंबा, टरबूज, खरबूज, काकडी आणि फळभाजी पिकाला काही प्रमाणात फटका बसू शकतो.

पार्श्वभूमी

Maharashtra Corona Lockdown : महाराष्ट्रात कडक निर्बंधांचा नवा लॅाकडाऊन? आज निर्णय होण्याची शक्यता
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कठोर निर्बंध लादण्यात आले असून वीकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज यासंदर्भात टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यात येणार असून त्यानंतरच याबद्दलचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे. काल (शनिवारी) राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक पार पडली. 


Rain | महाराष्ट्रातील काही भागांत वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
 शुक्रवारी रात्रीपासून महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊनची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं. नागरिकांनी या निर्देशांचं पालन करत घरात राहण्याला प्राधान्य दिलं. अशा परिस्थितीत सर्वांच्याच डोक्यावर कोरोनाचं संकट घोंगावत असताना अवकाळी पावसानं राज्यातील काही भागात हजेरी लावल्याचं दिसून आलं. 


CSK vs DC, IPL 2021: दिल्लीचा चेन्नईवर सात विकेट्सने शानदार विजय, पृथ्वी शॉ-शिखर धवन विजयाचे शिल्पकार
 आयपीएलच्या 14 व्या हंगामात दिल्लीने विजयी सुरुवात केली आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा 7 विकेट्सनी पराभव केला. चेन्नईने दिल्लीला 189 धावांचं आव्हान दिलं होतं. पृथ्वी शॉ आणि शिखर यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर दिल्लीने हे लक्ष्य 18.4 षटकांत पूर्ण केलं.


महाराष्ट्रासाठी येत्या तीन दिवसात 1121 व्हेंटिलेटर येणार : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
महाराष्ट्रासाठी येत्या तीन ते चार दिवसात 1121 व्हेंटिलेटर येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात दिली आहे. तसेच ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सहाय्य करणार आहेस, असंही ते म्हणाले.  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जे उपाय योजले जात आहेत त्याचे आपण पालन केले पाहीजे. पुणेकर नागरिकांनी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. हा कालावधी कोरोना संसर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठीची बंधने पाळली जावीत. अ‍से मत  प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.