मुंबई : निवडणूक आयोगाला जर आम्ही कोणती कागदपत्र सादर केलीच नव्हती तर त्यांनी आम्हाला इतर गोष्टींना परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न अनिल परब (Anil Parab) यांनी 'माझा कट्ट्या'वर (Majha Katta) उपस्थित केला. आमच्याकडे सगळ्या घटना असूनही त्यांनी निकालात याचा कशाचाच विचार केला नसल्याचा दावा देखील अनिल परब यांनी केला. यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची काहीच भूमिक नाही, हे सगळं भाजप करतंय, असा हल्लाबोल देखील अनिल परब यांनी माझा कट्ट्यावर केला. 


 अवघ्या राज्याचं लक्ष लागलेला आमदार अपात्रतेसंदर्भातला निकाल विधानसभा अध्यक्षांनी बुधवारी जाहीर केला. ज्यामध्ये कोणत्याही गटाचे आमदार अपात्र ठरवण्यात आले नाहीत तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच पक्षाला शिवसेना म्हणून मान्यता दिली. हा निकाल आपल्याला मान्य नसल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तात्काळ दिली आणि सुप्रीम कोर्टात पुढची लढाई लढणार असल्याचंही स्पष्ट केलं. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी माझा कट्ट्यावर संवाद साधला. आम्ही निवडणूक आयोगाकडे सगळे पुरावे सादर करुनही आम्हाला कोणते पुरावे मिळाले नसल्याचा निवडणूक आयोग म्हणतंय. त्यामुळे आम्ही ही घटना आता सर्वोच्च न्यायालायत सादर करणार असल्याची माहिती अनिल परब यांनी माझा कट्ट्यावर दिली. 


निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आम्ही कोर्टात गेलो


जेव्हा निवडणूक आयोगाने जेव्हा आम्हाला सांगितलं की आमच्याकडे कागदपत्र नाही, तेव्हाच आम्ही कोर्टात गेलो. आम्ही कोर्टात सगळे पुरावे सादर केलेत. आम्हाला 2013 मध्ये हे सगळं होईल, अशी काहीच कल्पना नव्हती तरीही आम्ही घटनेत बदल करुन निवडणूक आयोगाकडे ते सगळं सादर केलं असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.


पक्षाच्या नेत्याला काढण्याचा अधिकार पक्षप्रमुखाला आहे


विधानसभेचा गटनेता हे विधीमंडळ ठरवत नाही, तो पक्ष ठरवतो. त्यामुळे गटनेत्या काढण्याचा निर्णय पक्षाने घेतला. जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं, तेव्हा पक्षाने आणि पक्षप्रमुखांनी त्यांना काढण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी जेव्हा पक्ष विरोधात गेलं तर त्या व्यक्तीवर पक्ष कारवाई करु शकतो, असं अनिल परब यांनी म्हटलं. 


नार्वेकरांनी निवडणूक आयोगाचा निकाल वाचला


राहुल नार्वेकरांनी निवडणूक आयोगाचाच निकाल वाचला असल्याचा दावा देखील अनिल परब यांनी माझा कट्ट्यावर केला. निवडणूक आयोगानेही आमच्याकडे ज्या गोष्टी मागितल्या त्या सर्व आम्ही निवडणूक आयोगाला दिली. त्यामुळे तरीही जर आमच्या विरोधात निकाल दिला गेला, त्यामुळे ही लोकशाहीची सर्वात मोठी हत्या असल्याची प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली. 


म्हणून नार्वेकरांच्या भेटीनंतर कोर्टात गेलो


या देशात कोणता न्यायाधीश असा आहे, ज्यांच्याकडे केस चालू आहे आणि त्यांना जाऊन तुम्ही भेटलात. जर राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दुसऱ्या कोणत्या व्यासपीठावर चर्चा झाली असती तर आमचा काही आक्षेप नव्हता. पण ही चर्चा आरोपी आणि न्यायाधीशांमधली होती. त्यांच्या मतदारसंघाच्या कामासाठी चर्चा कऱण्यासाठी ते गेले असते तर आमचा काही आक्षेप नाही. पण अशी बंददाराआड चर्चा होत असेल तर त्यामध्ये काहीतरी खोट आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं. 


हेही वाचा : 


Anil Parab : मोठी बातमी! ज्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी ठाकरेंचा दावा नाकारला, त्याविरोधातील पुरावेच परबांनी 'माझा कट्टा'वर सादर केले