Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan : आजपासून लातूर येथील उदगीर येथे 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात होत आहे. या निमित्तानं उदगीरमध्ये तीन दिवस साहित्यिकांचा मेळा भरणार आहे. उदगीरवासियांसह राज्यभरातील वाचक आणि रसिक या मेळ्याचा रसास्वाद घेणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल आहे. साहित्यिकांबरोबरच संगीत क्षेत्रातील दिग्गज, हास्य अभिनेते, कवी,  गझलकार, कथाकथनकार यांचं सादरीकरणासह राजकीय नेत्यांच्या भाषणाकडेही लक्ष लागून आहे.  


ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे हे यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. उदगीर येथे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 22, 23 आणि 24 एप्रिल रोजी पार पडणार आहे.  उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात हे संमेलन होत आहे.  


आज ग्रंथदिंडी अन् उद्घाटन
  
साहित्य समेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज 22 एप्रिल रोजी सकाळी साडे सात ते 10 यावेळेत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.  यावेळी ग्रंथपूजन संमेलनाध्यक्ष भारत सासने यांच्या हस्ते होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून ही ग्रंथदिंडी संमेलनस्थळी दाखल होणार आहे.  


ग्रंथ दिंडीनंतर ध्वजारोहणाचा सोहळा पार पडेल. विविध दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामध्ये ग्रंथ प्रदर्शन, चित्र शिल्प कला दालन, अभिजात मराठी दालन, गझल कट्टा, कवी कट्टा या सारख्या विविध उपक्रमांचे उद्घाटन पार पडणार आहे. 


मुख्य उद्घाटन सोहळा साडे दहा वाजता सुरू होणार आहे. यासाठी संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हजर असणार आहेत. याशिवाय शिवराज पाटील चाकूरकर, अशोक चव्हाण, सुभाष देसाई यांचीही हजेरी असरणार आहे. यानंतर दिवसभर विविध विषयांवरील परिसंवाद पार पडणार आहेत. संध्याकाळी लोककला सादरीकरण होणार आहे.  


दुसरा दिवस 


संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 तारखेला जेष्ठ साहित्यिक राजन गवस यांच्या मुलाखातीने संमेलनाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर विविध विषयांवर परिसंवाद होणार आहेत. गझल कट्टा आणि कवी कट्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. याबरोबरच या दिवशी बालकवी संमेलनही होणार आहे. तसेच बाल कथाकथनचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उदगीर हे कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवर असल्यामुळे या भागातील निमंत्रीत कवींचे काव्यवाचन होणार आहे.  


तिसरा दिवस 


साहित्य संमेलनाच्या अंतिम दिवशी काही ठराविकच कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर चर्चासत्र, गझल कट्टा, कवी कट्टा आणि बालकांसाठी बालकांनी बनवलेल्या कथा आणि कविता वाचन होणार आहे. संध्याकाळी अवधूत गुप्ते यांच्या संगीत रजणीचा आस्वाद घेता येणार आहे. 



महत्वाच्या बातम्या