लातूर : 'परिवर्तन की है पुकार ...अब की बार किसान सरकार...' असा नारा देत चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांच्या बीआरएस पक्षानं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता प्रवेश करायला सुरुवात केली आहे. लातूर जिल्ह्यातही बीआरएस पक्षाने अनेकांना आपल्या पक्षात प्रवेश देत राजकीय चर्चेला तोंड फोडले आहे. 


तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस पक्षाचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव हे आक्रमक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पक्षाची मोर्चे बांधणी करत आहेत. मराठवाड्यातील नांदेड आणि त्याचप्रमाणे विदर्भातील नागपूर येथे जाहीर सभा घेतल्यानंतर बीआरएस पक्षाची वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या निमित्त बीआरएस पक्षाचे सर्व पदाधिकारी, नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते हजर राहणार आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्यासमोर एकाच वेळेस बीआरएस पक्षाचं प्रमोशन होईल या उद्देशानेच हे सर्व केलं जात आहे. मात्र त्याच वेळेस अनेक जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी करण्यातही पक्ष अग्रेसरच दिसतोय. 


लातूर जिल्ह्यातील अनेकांचा पक्षप्रवेश, अनेकजण वेटिंगवर....


लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहमदपूरचे शहराध्यक्ष वसंतराव शेटकर तसेच देविदास भोसले, माजी संचालक शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी, माजी औसा तालुका अध्यक्ष शिवसेना जिल्हा लातूर यांच्यासह अनेकांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. यात भाजपा आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि वंचित यासारख्या अनेक पक्षातील पदाधिकारी यांचा समावेश आहे.


पक्षप्रवेश थेट चंद्रशेखर राव यांच्या घरीच


बीआरएस पक्षाने एक नवीन रणनीती अवलंबली आहे. कोणत्याही पक्षातला किती छोटा किंवा मोठा कार्यकर्ता असेल, नेता असेल, यांचे प्रवेश थेट चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीतच होत आहेत. चंद्रशेखर राव यांचे हैदराबाद येथील प्रगती निवासस्थानी हे पक्ष प्रवेश केले जात आहेत. पक्षात येणाऱ्या सर्व लोकांची थेट संपर्क साधून चर्चा करत माहिती घेणे ही चंद्रशेखर राव यांची कार्यपद्धती आहे.


जिल्हाभरात बॅनर....


लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मोर्चे बांधणी सुरू आहे. चंद्रशेखर राव यांची राज्यांमध्ये अनेक ठिकाणी सभा सुरू आहेत. तेलंगणातील अनेक लोकप्रतिनिधींना घेत ते आता पंढरपूरच्या वारीतही सहभागी होणार आहेत. ही संपूर्ण वातावरण निर्मिती करत असताना जिल्ह्याभरात ठिकठिकाणी बॅनर झळकत आहेत. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आवाहन करत पक्षाची पाळमुळं ग्रामीण भागात रुजवण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे.


गाव पातळीवरील रचना


भारत राष्ट्र समितीने तेलंगणामध्ये केलेली काम, सरकारच्या विविध योजना, एसटी, ओबीसी आणि एसटी प्रवर्गासाठी असणाऱ्या योजना, शेतकऱ्यांना तसेच व्यापारी, बेरोजगारांना देण्यात येणाऱ्या विविध योजना याची माहिती देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात नऊ कमिटी तयार करण्यात आल्या आहेत. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी तालुका पातळीवर या नऊ कमिटी तयार करण्यात आले आहेत. याच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत बीआरएसने केलेल्या कामाची माहिती देण्याचा प्रयत्न सुरू आहे.


पक्षप्रवेशासाठी महाराष्ट्रातून गेलेल्या कार्यकर्त्यांमध्ये लातूरमधील कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. चंद्रशेखर राव यांनी बराच वेळ लातूरमधील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. गाव पातळीवरील समस्या समजून घेतल्या. गाव पातळीवर कमिटी कशी स्थापन करायची आणि कमिटीच्या माध्यमातून गावाचा विकास कसा करायचा याबाबत ही मार्गदर्शन केलं अशी माहिती सहदेव व्होनाले यांनी दिली. ते वंचित बहुजन आघाडीचे अहमदपूर तालुकाध्यक्ष होते. त्यांनी बीआरएस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.


21 तारखेला झालेले पक्षप्रवेश ....



  • देविदास भोसले, माजी संचालक किल्लारी साखर कारखाना, माजी तालुका अध्यक्ष शिवसेना औसा, जिल्हा लातूर.

  • बाबुराव जंगापल्ले ( मामा) माजी जिल्हा परिषद सदस्य लातूर, माजी तालुका अध्यक्ष भाजप

  • सहदेव व्होनाळे माजी तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अहमदपूर,

  • वसंत तात्या शेटकर, माजी नगराध्यक्ष, माजी शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अहमदपूर

  • प्रताप भोसले, लातूर जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी

  • विजय आचार्य, जिल्हा उपाध्यक्ष आम आदमी पार्टी लातूर

  • सयदोद्दीन सय्यद, लातूर जिल्हा सचिव आम आदमी पार्टी

  • सिध्देश काळे, लातूर शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी

  • राजकुमार गडगळे, आम आदमी पार्टी, तालुका अध्यक्ष रेणापूर

  • वसंत शेडंगे, तालुका उपाध्यक्ष रेणापूर, आम आदमी पार्टी...


ही बातमी वाचा :