Raju Shetti : ऊस आंदोलन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे समीकरण रुढ झाले आहे. त्यामुळे अनेक साखर कारखानदारांना नमते घ्यावे लागले आहे. 2013 मध्ये झालेल्या ऊस आंदोलनावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांवर  गुन्हे दाखल झाले आहेत. 


या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल झालेल्या पारगांव, घुणकी व किणी येथील आंदोलनातील सर्व कार्यकर्त्यांसह माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पेठवडगांव सत्र न्यायालयात हजेरी लावली. या आंदोलनामध्ये  जवळपास 27 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. 



9 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या या गुन्ह्यामध्ये सर्वाधिक तरूण कार्यकर्ते आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांनी त्यांच्यासमवेत न्यायालयात हजेरी लावली. या सारख्या तरूणांमुळेच आजपर्यंतची अनेक आंदोलने यशस्वी झालेली आहेत. गेल्या 10 वर्षांपासून हे सर्व कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी माझ्यासोबत न्यायालयीन लढा देत असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.


एफआरपी आणि एकरकमी मिळण्यासाठी कंबर कसली 


दरम्यान, राजू शेट्टी यांनी ऊसाला अधिक एफआरपी आणि एकरकमी मिळण्यासाठी कंबर कसली आहे. यावेळी लवकर सुरू होणार्‍या गळीत हंगामासाठी शेतकर्‍यांना एकाच हप्त्यात एफआरपी द्यावी अशी त्यांची इच्छा आहे. त्यांनी सांगितले की, कारखान्यांनी त्यांनी उत्पादित केलेल्या इथेनॉलसाठी मिळणाऱ्या चढ्या किंमतीची रक्कम रोखून धरली आहे. तसेच साखरेचे दर स्थिर होते. त्यामुळे साखर कारखान्यांना मोठा फायदा झाला आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनाही मिळावा अशी आमची इच्छा आहे. 


आगामी हंगामासाठी उसाला प्रतिटन 3500 ते 3700 रुपये भाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. हे केवळ शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी नाही, तर शेतकर्‍यांना वाढलेल्या खर्चाची भरपाई करणे, मुख्यतः कीटकनाशके आणि खते यांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या