Jalna News : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असून, राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. त्यातच, सत्ताधारी व विरोधक एकमेकांविरुध्द विविध कारणावरुन आरोप प्रत्यारोप करत आहे. आगामी काळात होणारे सण उत्सवाच्या अनुषंगाने सद्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता आता प्रशासन देखील अलर्ट झाले आहेत. तर जालना जिल्ह्यात (Jalna District) आता 2 मे पर्यंत परवानगीशिवाय पाच पेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई असल्याचे आदेशच प्रशासनाने काढले आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार कलम 37 (1) व (3) अन्वये हे आदेश जारी करण्यात आला आहे. 


गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द विविध कारणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहे. अशात 22 एप्रिल रोजी रमजान ईद साजरा होणार आहे. तर 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आहे.  त्यामुळे राज्यात होणाऱ्या या उत्सवाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तसेच मराठा आरक्षण मिळावे या मागणीसह शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची नाकारता येत नाही. त्यामुळे जालना जिल्ह्यात अपर जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी करण्यात आला आहे. तर   हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी 2 मे रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. 


काय म्हटले आहे आदेशात?


पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी, भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणाऱ्या वस्तू जवळ बाळगता येणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तू जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही. वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तू बाळगणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. 


यांना आदेश लागू राहणार नाही...


तसेच अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे. हा आदेश कामावरील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही. तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


अखेर छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या बीआरएस पक्षाच्या सभेचं ठिकाण ठरलं; असं असणार नियोजन