Sharad Pawar on PM Narendra Modi : लोकांना आता मोदी नको, हुकूमशाही नको, तर लोकशाही पाहिजे. मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर केली आहे. आज जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha Constituency) शरद पवार गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यात ते बोलत होते.


शरद पवार म्हणाले की,  मी कृषी मंत्री झालो तेव्हा केवळ एक महिन्याचे धान्य शिल्लक होते. मी अस्वस्थ झालो. आमच्या लोकांना खायला नाही.  शेतकऱ्याच्या घामाची किंमत मिळाली पाहिजे. मागील काळात आपण शेतीसाठी दिंडी काढली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. देशाला धान्य देणारा शेतकरी आत्महत्या का करतो? म्हणून मी अस्वस्थ झालो होतो. मागील काळात 61 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. 


मोदी भाजपचे पंतप्रधान असल्यासारखे वागताय


आज देशाचे चित्र बदललेले आहे. जो देश धान्य आयात करत होता आता तोच देश निर्यात करत आहे. हे शेतकऱ्यांनी केले आहे. जगभर साखर पुरवली जात आहे. आज मोदी यांचे राज्य आहे. बळीराजाला मदत होईल असे काही नाही. जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली जात आहे. ज्यांनी देशासाठी खस्ता खायल्या आहेत त्यांच्यावर टीका करणे हे काय पंतप्रधानांचे काम आहे का? आपण देशाचे पंतप्रधान आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. ते भाजपचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत.  


अगोदर तुम्ही काय केले ते सांगा मग इतरांवर टीका करा


भाव वाढल्याने सामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले आणि ते विचारता तुम्ही काय केले? आज देशात वेगळा विचार करण्याची गरज आहेत. कधी राहुल गांधींवर टीका करतात. त्यांनी देशाच्या सगळ्या भागात जाऊन जनतेचे प्रश्न समजून घेतले. त्यांच्यावर टिंगल केली जात आहे. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर पक्षाची जबाबदारी घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. अगोदर तुम्ही काय केले ते सांगा मग इतरांवर टीका करा. 


शासकीय यंत्रणेचा उपयोग हुकूमशाहीसारखा केला जातोय 


काँग्रेसचा विचार ग्रामीण भागात फैजपूर अधिवेशनापासून दिला गेला. अनेक नेते होऊन गेले, त्यांनी राज्याचा आणि देशाचा विचार केला. आता मोदींचे काळात काय आहे? अनेक लोकांना नोकरी नाही. आज दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. केळीचे पीक नष्ट झाले, मात्र शासकीय यंत्रणेचा उपयोग हुकूमशाहीसारखा केला जात आहे. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले जात आहे याचा अर्थ ही हुकूमशाही आहे. 


मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही


बाबासाहेबांनी शेवटच्या माणसासाठी काम करण्याचा प्रयत्न केला होता. या देशाची घटना बदलून मोदींना जास्त अधिकार देण्याची मागणी यांच्याकडून केली जात आहे. लोकांना मोदी नको. हुकूमशाही नको, लोकशाही पाहिजे, आमच्या आघाडीमध्ये ठाकरे असतील, काँग्रेस असतील, किंवा अन्य सगळ्यासाठी आम्ही आघाडी केली आहे. आता तुमची मदत पाहिजे आहे. मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. 


आणखी वाचा 


'शरद पवारांना माहीत होतं घरातलं नुकसान होईल, त्यामुळेच नगरमध्ये बाहेरचा उमेदवार दिला'; सुजय विखेंचं जोरदार प्रत्युत्तर