जळगाव : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन मुलाने विनानंबरच्या पोर्श गाडीने (Pune Porsche Car Accident) दोघांना उडवले. हे प्रकरण संपूर्ण देशात गाजत आहे. या अपघातात राजकीय दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला जात आहे. आता जळगावच्या (Jalgaon News) रामदेववाडी येथील अपघातातही राजकीय दबाव टाकला जात असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  


जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी (Ramdevwadi) अपघातात चार जण ठार झाले आहेत. मात्र या अपघातात कारचालक आणि त्यात बसलेली मुले ही मोठ्या नेत्यांची मुले असल्यानं या प्रकरणात पोलिसांनी केलेला तपास हा समाधानकारक नाही. पोलीस कोणाच्या तरी दबावखाली असून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच या अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार (NCP Ajit Pawar) गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार (Sanjay Pawar) यांचा मुलगा आरोपी असल्याने राजकीय दबाव टाकला जात असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर केला आहे. 


पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केलाय 


एकनाथ खडसे म्हणाले की, या सगळ्या प्रकरणात ज्या पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केला आहे. त्यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी. या घटनेत अजून आरोपी आहेत ते पोलिसांनी निष्पन्न करावे. अपघाताचा घटनेनंतर पोलिसांनी 17 दिवसांपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आपण गृहमंत्र्यांपासून ते पोलीस अधीक्षकांकडे स्वतः पत्र देऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. 


पोलीस राजकीय दबावापोटी आरोपींना वाचवताय


त्यानंतर कारवाईला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळाले. मात्र ही कारवाई फारशी समाधानकारक झाली नाही. आरोपींना रुग्णालयात भरती केल्याचे सांगण्यात आले. मात्र 17 दिवस त्यांना दवाखान्यात ठेवण्यात आले, अशी त्यांची परिस्थिती नव्हती. पोलीस राजकीय दबावापोटी आरोपींना वाचवत असल्याचं चित्र आहे. यात आरोपींच्या वडिलांचे जिल्ह्यातील एका मंत्र्यांशी संबंध आहेत. तर दुसरा मुलगा हा राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष संजय पवार (Sanjay Pawar) यांचा मुलगा असल्याने या प्रकरणावर राजकीय दबाव आहे. 


आरोपींच्या मोबाईलचे सिडीआर तपासावे


यात आरोपींचा रक्ताचा नमुना देखील पारोळा येथे घेण्यात आले. तेही सहा तासांनंतर घेतले गेले. त्यामुळे अमलीपदार्थ अंमल कमी होण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर आरोपींच्या मोबाईलचे सिडीआर तपासण्यात यावे,  अशी मागणी एकनाथ खडसे यांनी यावेळी केली आहे. 


रामदेववाडी अपघातात चार जणांचा मृत्यू


दरम्यान, रामदेववाडी जवळ ७ मे रोजी भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने आईसह दोन मुले व भाचा असा चार जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचे चिरंजीव अखिलेश संजय पवार आणि बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल या दोघांना २३ मे रोजी ताब्यात घेण्यात आले.


आणखी वाचा 


Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये नेत्याच्या गाडीने बाप-लेकाला उडवून पळ काढला, दुसरा दिवस उलटूनही गुन्हा दाखल होईना, राजकीय दबावाचा संशय