Jalgaon News जळगाव : राज्यात उष्णतेचा पारा (Temperature) रोज नवे उच्चांक गाठत आहे. गेल्या काही दिवसापासून विदर्भासह खान्देशात देखील सूर्य जणू काही आग ओकू लागला आहे, असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या उन्हाचा धोका लक्षात घेता जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी मोठा निर्णय घेत जिल्ह्यात 144 कलमान्वये आदेश पारित करण्यात आला आहे. एकीकडे उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असतानाच काल जिल्ह्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि वादळी वाऱ्याने एकच दाणादाण उडवली आहे.


अचानक आलेल्या या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे एक घर कोसळून एकाच कुटुंबातील चार जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या अंबापाणी गावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, सुदैवाने यात चार वर्षाचा मुलगा थोडक्यात बचावला आहे. 


एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू


दिवसभराच्या कडक उन्हानंतर काल रविवारच्या सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यात यावलच्या आंबापाणी गावाजवळील एक मातीच घर कोसळल्याची घटना घडली. सातपुडा पर्वत रांगेतील ही घटना आहे. यात चार जण ढीगाऱ्या खाली दबल्याने यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये पती, पत्नी  आणि दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून एकाच कुटुंबातील चौघांचा अशा पद्धतीने  दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. तर सुदैवाने यात चार वर्षाचा मुलगा थोडक्यात बचावला आहे.


या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल हॉट त्यांनी मृतदेह यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल झाले असल्याची माहिती पुढे आली आहे. एकीकडे सूर्य आग ओकू लागत असताना जिल्ह्यात अवकाळी पावसानेही धुमाकूळ घालत नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण केले आहे. 


उष्णतेच्या लाटेने मयत झालेल्यांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार


नुकतेच जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत पावलेल्या 20 लोकांवर एकाच वेळी अत्यसंस्कार करण्यात आले आहेत. जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या जी एम फाऊंडेशनच्या वतीने या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यात उष्णतेच्या लाटेने (Jalgaon Heat Wave) या सर्वांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला राहून उदरनिर्वाह करणाऱ्या पन्नासहून अधिक लोकांचा गेल्या आठ दिवसात मृत्यू झाल्याची ही घटना घडली आहे.


उष्णतेच्या लाटेने या सर्वांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यापैकी 30 जणांची ओळख पटली होती, पण इतर 20 मृतदेहांची ओळख मात्र पटली नव्हती. त्यांच्यावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. वाढत्या उष्णेतेच्या लाटेचा परिणाम म्हणून रस्त्याच्या कडेला राहून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. हे सर्व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले होते.


इतर महत्वाच्या बातम्या