जळगाव : गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीकास्त्र सोडणारे भाजपतील नाराज नेते एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांची जळगावात एकत्रित भेट झाली. दोन दिवसांपूर्वी खडसे यांनी थेट नावं घेत फडणवीस आणि महाजनांनी जाणीवपूर्वक आपलं तिकीट कापलं असल्याचा आरोप केला होता. यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. एकीकडे खडसे-महाजन-फडणवीस वाद तर दुसरीकडे जळगाव जिल्हापरिषदेची निवडणूक असल्याने सर्वांचे लक्ष जळगावच्या राजकारणाकडे लागून होते. या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र आल्याने भाजपसमोर आव्हान होते मात्र भाजपने आपला गड कायम राखण्यात यश मिळवले आहे.


जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या रंजना पाटील
जळगाव जिल्हा परिषदेत भाजपनं आपला 30 वर्षांचा गड राखला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या रंजना पाटील, तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील विजयी झाले आहेत. या दोन्ही उमेदवारांना 34 मतं मिळाली. त्यात काँग्रेसच्या एका सदस्यानं बंडखोरी केली. तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 30 मतं मिळाली आहेत. भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची विजयाचा चंग बांधला होता. त्यासाठी दोन्ही नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून जळगावमध्येच ठिय्या मांडला होता. त्यामुळं अखेर जळगावचा गड भाजपनं राखण्यात यश मिळालं.



महाविकासआघाडीकडे जास्त जागा असून भाजपची बाजी
राज्याच्या दृष्टीने अतिशय लक्षवेधी असलेल्या जळगाव जिल्हापरिषदेवर आज भाजपने आपली गेल्या तीस वर्षांची विजयी परंपरा कायम राखण्यात यश मिळवले. अध्यक्षपदी भाजपच्या रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील विजयी झाले. या निवडणुकीचा विचार केला तर एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि महाविकास आघाडीचे गुलाबराव पाटील यांच्या दृष्टीने ही निवडणूक राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाची होती. तितकीच प्रतिष्ठेचीही होती. खुल्या वर्गासाठी महिला राखीव असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपच्या रंजना पाटील यांनी महाविकास आघाडीच्या रेखा राजपूत यांचा 34 विरुद्ध 31 अशा मतांनी पराभव केला. भाजपकडे स्वबळाचे 33 उमेदवार होते. यामध्ये नंदा सपकाळे या आजारी असल्यानं गैरहजर राहिल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे तीन सदस्य आपल्याकडे खेचण्यात भाजपला यश मिळाले आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचे दिलीप पाटील, तर राष्ट्रवादीच्या मीना पाटील यांच्यासह आणखी एक सदस्य गळाला लावण्यात भाजपला यश मिळाले आहे. या लढतीमध्ये एकूण 66 सदस्यांचं मतदान होतं. पक्षीय बलाबलाचा विचार केला तर भाजप 33, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 16, शिवसेना 15 अशा प्रकारचं बलाबल होतं.



खडसे- महाजन-फडणवीस मनोमिलन?
दरम्यान याआधी, तिन्ही नेत्यांमध्ये जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती खडसेंनी दिली. अन्य कुठलीही चर्चा झालेली नाही, असा दावा खडसेंनी केला. तर, फडणवीस आणि खडसेंमध्ये लवकरच मनोमिलन होण्याची आशा महाजनांनी व्यक्त केली. या बैठकीनंतर फडणवीस हेलिकॉप्टरनं नंदुरबारला तर महाजन-खडसे एकाच गाडीतून पुढे रवाना झाले. त्यामुळे आता फडणवीस या बैठकीबाबत काय बोलताहेत, हे पाहणं महत्वाचं आहे. आज जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होतेय. राज्यातील सत्ता हातून गेल्यानंतर आता जळगाव जिल्हा परिषद आणि नंदुरबारमधील पंचायत समिती राखण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान जिल्हा परिषदेतील विजयानंतर खडसे यांनी भाजपची सत्ता यापुढेही कायम राहील. जळगावचा गड राखल्यानंतर एकनाथ खडसे आणि गिरीष महाजनांनी एकत्र येत पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. जळगावचा जिल्हा परिषदेचा गड राखल्यानंतर भाजप नेते गिरीष महाजनांनी हे संघटनात्मक यश असल्याचं सांगितलं आहे. जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला आहे. आमच्यात कुठेही कटूता नाही, हे तुम्हाला दिसलं असेल, असंही महाजन म्हणाले.



 खडसे यांचा नाराजीनामा शमला का?
36 तासांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि महाजन यांच्यासोबत 36 चा आकडा असलेले खडसे बरोब्बर 36 तासानंतर त्यांच्याचसोबत चहापानात रमले होते. त्यामुळे खडसे यांचा नाराजीनामा शमला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीसांवर नाराज होते. त्यांची खदखद कधी पंकजा मुंडेंच्या व्यासपीठावरुन दिसली. तर थेट दिल्लीतही दिसली. पण त्याचा कळस गाठला गेला तो एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत. या मुलाखतीत खडसेंनी थेट फडणवीस आणि महाजन यांची नावं घेत टीका केली.
Eknath Khadse Exclusive | फडणवीस, महाजनांनी माझं राजकारण संपवण्याचा डाव जाणीवपूर्वक आखला, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

काय म्हणाले होते खडसे 
स्वतःचं राजकारण सरळ करून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी मला तिकीट मिळू न देऊन आपलं राजकारण जाणीवपूर्वक संपवण्याचा डाव आखल्याचा खळबळजनक आरोप एकनाथ खडसे यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत केला होता. मी प्रामाणिकपणे आजपर्यंत काम केलं आहे. त्यामुळे मला घाबरण्याचे कारण नाही. मी माघार घेणाऱ्यातला माणूस नाही. जे सत्य आहे ते मांडलं पाहिजे या विचारांचा मी आहे, असेही खडसे म्हणाले होते. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याविषयी नाराजी व्यक्त केल्यामुळेच आपल्याला तिकीट नाकारण्यात आल्याची माहिती कोअर कमिटीमधील आपल्या जवळच्या मित्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आपल्याला दिल्याचे खडसे यांनी म्हटलं होतं.

गिरीश महाजनांनी दिलं होतं स्पष्टीकरण

खडसे यांच्या आरोपानंतर गिरीश महाजनांनी नाथाभाऊंना चुकीची माहिती देण्यात आली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत असा कुठलाही विरोध किंवा चर्चा देखील झाली नाही. राज्यात चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, विनोद तावडे, राज पुरोहित यांना देखील तिकीट मिळाले नाही. कुणीतरी सांगितले म्हणण्यापेक्षा चुकीच्या माहितीच्या आधारे असं बोलणं चुकीचं आहे. याचा सोक्षमोक्ष होणं गरजेचं आहे, असे महाजन म्हणाले होते. चुकीच्या माहितीच्या आधारे असे आरोप करणे योग्य नाही, मी याबाबत खडसे यांच्याशी बोलेन, असेही महाजन यांनी म्हटलं होतं. खडसे यांनी व्यवस्थित माहिती घेऊन चर्चा करावी. कुठंतरी मीटिंगमध्ये चर्चा झाली किंवा आम्ही विरोध केला अशा ऐकीव गोष्टीवरून टीका करू नये. केंद्रीय निवड समितीने या सर्व लोकांचा निर्णय केला आहे. त्यामुळे हे आरोप चुकीचे आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

संबंधित बातम्या

एकनाथ खडसे भविष्यात राज्याच्या विधीमंडळात किंवा दिल्लीत दिसतील, सुधीर मुनगंटीवारांचा दावा 

निवडणुकीत पक्षविरोधी काम केलेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार, एकनाथ खडसेंना  

Eknath Khadse on Loan Waiver | शेतकरी कर्जमाफीच्या निर्मयाचं एकनाथ खडसेंकडून स्वागत 

Nagpur | खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला उधाण, नागपूरात शरद पवारांची घेतली भेट | ABP 

Eknath khadse I एकनाथ खडसेंचे तिकीट केंद्रीय नेतृत्वाने कापले - फडणवीस I एबीपी माझा 

गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाबाबत खडसेंनी केलेला आरोप खोटा : देवेंद्र फडणवीस 

Eknath Khadase I ज्यांना मोठे केले त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती - एकनाथ खडसे I एबीपी माझा