गुवाहाटी : वेस्ट इंडीज सोबतच्या मालिक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघ आता श्रीलंका क्रिकेट संघासोबत भिडण्यासाठी सज्ज झाला आहे. तीन टी-20 मालिकेतील पहिला सामना शनिवारी गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. मात्र, गुवाहाटीत सध्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं सुरू आहेत. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या या सामन्यावर या आंदोलनाचं सावट आहे. बीसीसीआय आणि आसाम क्रिकेट मंडळ यावर लक्ष ठेवून आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती एसीएचे अध्यक्ष रोमेन दत्ता यांनी दिली आहे.


भारतीय क्रिकेट संघ शुक्रवारी सकाळी गुवाहाटीत पोहचेल, असं रोमेन दत्ता यांनी सांगितले आहे. तर, संघ व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार भारतीय टीम गुरुवारी रात्री पोहचणार आहे. या वेगवेगळ्या दाव्यांमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दत्ता म्हणाले, की श्रीलंकन क्रिकेट संघ आज चार वाजता येणार आहे, तर भारतीय टीम उद्या सकाळी पोहचेल. मात्र, भारतीय टीमच्या एका सदस्याने सांगितले, की "आम्ही आज रात्रीच गुवाहाटीत पोहचू. भारतीय क्रिकेट संघाची नवीन वर्षातील ही पहिलच मालिका आहे. सोबतच यावर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाचीही तयारी भारतीय संघ करत आहे.

भारतीय संघाची घोषणा -
श्रीलंकेसोबत होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. यात हिटमॅन रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षातला सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलेल्या शमीला विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय संघव्यवस्थापनानं घेतला आहे. नव्या वर्षात टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळणार आहे. 5 जानेवारीपासून या मालिकेतला पहिला सामना खेळवण्यात येईल. सर्व सामने हे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होतील.

पहिली टी ट्वेन्टी 5 जानेवारी (गुवाहाटी)
दुसरी टी ट्वेन्टी 7 जानेवारी (इंदूर)
तिसरी टी ट्वेन्टी 10 जानेवारी (पुणे)
श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेन्टी मालिकेसाठीचा भारतीय संघ पुढीलप्रमाणे:
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रविंद्र जाडेजा, शिवम दुबे, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनीष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन

हेही वाचा - श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराह आणि धवनचं संघात पुनरागमन

CAA Protest | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात अकोल्यात मुस्लिम समाजाचा मोर्चा | ABP Majha