कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधक यशवंत सिन्हा शनिवारी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सिन्हा यांनी दावा केला की कंधार विमान अपहरण दरम्यान ममता बॅनर्जी यांनी स्वत: ला दहशतवाद्यांच्या स्वाधीन करण्याची ऑफर दिली होती. यशवंत सिन्हा म्हणाले की, सुमारे दोन दशकांपूर्वी तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी कंधार विमान अपहरण प्रकरणात प्रवाशांच्या सुटकेसाठी ओलिस म्हणून तेथे जाण्याची ऑफर दिली होती. 24 डिसेंबर 1999 रोजी एअर इंडिया विमानाचं अपहरण झालं होतं, त्याच्या आठवण यशवंत सिन्हा यांनी सांगितली. 


यशवंत सिन्हा म्हणाले की, "जेव्हा भारतीय विमान आयसी 814 चं अपहरण केले गेले आणि विमान कंधार, अफगाणिस्तानात नेले. त्यावेळी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यामध्ये ममताजींनी ओलिस म्हणून जाण्याची ऑफर दिली. पण अट अशी असेल की दहशतवाद्यांनी इतर प्रवाशांना मुक्त करावे."


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांचे कौतुक करताना सिन्हा म्हणाले की, 'ममता सुरुवातीपासूनच एक योद्धा आहे. त्यांना त्यांच्या जीवाची भीती वाटत नाही. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यावेळी 1999 मध्ये यशवंत सिन्हा केंद्रीय अर्थमंत्री होते. या घटनेच्या वेळी ममता रेल्वेमंत्री होत्या. त्याचा पक्ष तृणमूल कॉंग्रेस तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमधील सहयोगी होता.


TMC Candidate List 2021: टीएमसीच्या यादीत 114 नवे चेहरे, कार्यकर्ते ममता बॅनर्जींवर नाराज, पोस्टर्स लावले


TMC मध्ये येण्यापूर्वी मी ममतांशी 45 मिनिटे चर्चा केली


तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांच्याशी सुमारे 45 मिनिटे चर्चा केली. विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसचा जबरदस्त बहुमताने विजय काळाची गरज आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या पराभवाचा आणि देशाला वाचवण्याचा संदेश जाईल, असं यशवंत सिन्हा म्हणाले. 


2018 मध्ये भाजपला सोडचिट्ठी


माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात यशवंत सिन्हा यांनी अनेक मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली आहे. परंतु पक्षाच्या नेतृत्वाशी मतभेद झाल्यामुळे 2018 मध्ये त्यांनी भाजपची साथ सोडला. त्यांचा मुलगा जयंत सिन्हा झारखंडमधील हजारीबाग लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार आहेत. आयुष्याची आठ दशके पूर्ण केलेल्या सिन्हा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसचा प्रचारही केला होता.


आएएसची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश


यशवंत सिन्हा 1990 मध्ये चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते आणि त्यानंतर वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळानेही त्यांना या मंत्रालयाची जबाबदारी दिली. वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी परराष्ट्रमंत्री म्हणूनही काम पाहिले. 1977 मध्ये ते बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचे प्रधान सचिव होते. पण लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रभावामुळे त्यांनी 1984 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतून राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला होता.