नवी दिल्ली : राजस्थानमध्ये आजपासून विधानसभेचं अधिवेशन सुरु होणार आहे. याआधी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काल आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सचिन पायलट देखील उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री गहलोत यांनी विधानसभा अधिवेशनाची घोषणा केली. तसेच भाजपने घोषणा केली आहे की, ते विधानसभा सत्राच्या पहिल्याच दिवशी गहलोत सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडणार आहेत. परंतु, भाजपने उचललेलं हे पाऊल अत्यंत आश्चर्य वाटण्यासारखंच आहे. कारण सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडेही पुरेशा जागा नाहीत.


सचिन पायलट यांच्या घरवापसीमुळे टळला धोका


गेल्या अनेक दिवसांपासून राजस्थान काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादांवर आता पडदा पडला आहे. बुधवारी सचिन पायलट मुख्यमंत्री गहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या आमदारांच्या बैठकीत सहभागी झाले होते. नारजी दूर झाल्यानंतर सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यातील ही पहिली भेट होती. त्याचसोबत गहलोत सरकारवर आलेलं अस्थिरतेचं संकटही टळलं.


भाजप अविश्वासाचा ठराव मांडण्याच्या तयारीत


राजस्थानमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांचं म्हणणं आहे की, कॉंग्रेसने ज्या पद्धतीने परिश्रम घेतले आहेत, हे पाहून ते विश्वासाने मत देण्याचा विचार करत आहेत. त्याचसोबत त्यांचं म्हणणं आहे की, ते राजस्थान सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्याचा विचार करत आहेत.


आकड्यांमध्ये भाजप मागेच


सध्या 200 विधानसभेच्या जागा असलेल्या राजस्थान विधानसभेत भाजपकडे राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे 3 आमदार आणि एका अपक्ष उमेदवाराचा पाठिंब्यासोबत एकूण 76 जागा आहेत. तसेच एकूण 200 जागा असणाऱ्या राजस्थान विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 101 आमदारांचं समर्थन असण्याची गरज आहे.


अशातच सचिन पायलटच्या घरवापसीसोबतच पुन्हा एकदा काँग्रेसकडे 107 आमदारांचं समर्थन आहे. सचिन पायलटच्या समर्थनात 19 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे गहलोत सरकारवर संकटाचं सावट आलं होतं. परंतु, पायलट यांच्या घरवापसीमुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकावरील संकट दूर राहिलं आहे.


अयशस्वी ठरू शकतो भाजपचा अविश्वास ठराव


राजस्थान विधानसभेत इंडियन नॅशनल काँग्रेसला 107 जागांवर काँग्रेस, तर 13 जागांवर अपक्ष आमदार, भारतीय कम्युनिस्ट पार्टीला 2, भारतीय ट्रायबल पार्टीला 2, राष्ट्रीय लोक दलाला 1, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीला 3 आणि भारतीय जनता पार्टीला 72 जागा मिळाल्या आहेत. भाजपचे आकडे पाहिले तर बहुमत गाठण्यासाठी त्यांना खूप मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. तसेच अपक्ष, भारतीय ट्रायबल पार्टीचे 2, माकपा 1 आणि राष्ट्रीय लोक दलाच्या आमदरांचा पाठिंब्यामुळे काँग्रेसच्या समर्थनार्थ 124 मतं निश्चित आहेत. त्यामुळे भाजपचा अविश्वास ठराव अयशस्वी ठरू शकतो.


महत्त्वाच्या बातम्या :