नवी दिल्ली : भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी 12 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेतली होती. या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी पत्रकार परिषद घेत कोर्टाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले होते. या चौघांपैकी एक असलेल्या न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांनी पत्रकार परिषदेच्या आयोजनासंबंधी मोठा खुलासा केला आहे.


"चारही न्यायमूर्तींना तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर बाहेरील लोकांकडून काहीतरी दबाव होता अशी शंका होती. आम्ही सरन्याधीशांना पत्र लिहून न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याबाबत आग्रह केला होता. मात्र स्थिती बदलली नाही, त्यामुळेच आम्ही पत्रकार परिषद घेतली," असे न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे.

न्यायमूर्ती जोसेफ यांनी सांगितले की, "महत्वाच्या केसेस अशा न्यायाधीशांकडे दिल्या जात होत्या, ज्यांच्या राजकीय संबंधाच्या चर्चा सर्वत्र होत्या. आम्हाला ही गोष्ट योग्य वाटली नाही. न्यायपालिकेची विश्वासार्हता जपण्यासाठी आम्हाला समोर येणे गरजेचे होते."

न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणी विचारले असता ते म्हणाले की, "ही केवळ एकच घटना नव्हती. अशा अनेक घटनांमध्ये बाहेरील हस्तक्षेप होत होता. ज्या दिवशी आम्ही पत्रकार परिषद घेतली, त्या दिवशी लोयांच्या केसची एका खास बेंचसमोर सुनावणी होती. बाहेरील हस्तक्षेप हा राजकीय होता की अन्य काही, यावर मी बोलू शकत नाही मात्र सरन्यायाधीशांचे अनेक प्रशासकीय निर्णय त्यांच्या स्वातंत्र्यावर कुणाचा तरी दबाव आणून घेतल्यासारखे वाटत होते."

सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, खुद्द न्यायमूर्तींची हतबलता
"सुप्रीम कोर्टाचा गेल्या दोन महिन्यातील कारभार व्यथित करणारा आहे. काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्ट प्रशासन नीट काम करत नाही. याबाबत मुख्य न्यायमूर्तींसमोर प्रश्न मांडले, पण काहीच उपयोग झाला नाही", अशी हतबलता दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नाही तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मांडली होती.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी पत्रकार परिषद घेतली. विशेष म्हणजे ज्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली ते सरन्यायाधीशांनंतरचे सर्वात सीनियर आहेत. न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या घरासमोर ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

न्यायमूर्ती नेमकं काय म्हणाले?
"पत्रकार परिषद बोलावताना आम्हाला अजिबात आनंद होत नाही. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून न्यायव्यवस्थेत जे काय सुरु आहे, ते व्यथित करणारं आहे. सुप्रीम कोर्ट प्रशासनाचं कामकाज सुरळीत होत नाही. याबाबत आम्ही सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्रही लिहिलं. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सरन्यायाधीशांना लिहिलेलं पत्र सार्वजनिक करणार आहोत. आम्ही आमचा आत्मा विकला, असं आम्हाला भविष्यात कोणीही बोलू नये. न्यायव्यवस्था टिकली नाही, तर लोकशाही टिकून राहणार नाही," असं चारही न्यायमूर्ती पत्रकार परिषदेत म्हणाले.

न्यायमूर्ती लोया खटला
गुरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणी सुनावणी करणारे विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश बी एच लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. त्याबाबत आजची पत्रकार परिषद आहे का, अशी विचारणा न्यायमूर्तींना करण्यात आली. त्यावर त्यांनी होय असं सांगितलं.

न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
मागील दोन महिन्यांपासून सुप्रीम कोर्टाचं कामकाज अव्यस्थित झालंय, प्रशासन नीट काम करत नाही
आम्ही खटकणाऱ्या काही गोष्टी सरन्यायाधीशांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते निष्फळ ठरलं
आम्ही आमचा आत्मा विकला, असं आम्हाला भविष्यात कोणीही बोलू नये
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना लिहिलेलं पत्र सार्वजनिक करणार
निष्पक्ष न्यायव्यवस्था नसेल तर लोकशाही टिकून राहणार नाही
न्यायशास्त्राच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना, ही पत्रकार परिषद बोलवताना आम्हाला अजिबात आनंद होत नाही
आम्ही कोणतंही राजकारण करत नाही आणि सरन्यायाधीशांवर ठपका ठेवण्याचा कोणताही इरादा नाही

संबंधित बातम्या

सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, खुद्द न्यायमूर्तींची हतबलता

न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे?

सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत?

सोहराबुद्दीन प्रकरणातील जजच्या मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी

सरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील

PHOTO : न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेतील 6 महत्त्वाचे मुद्दे