नवी दिल्ली : विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाशी मैत्री करायला हवी, मात्र त्याचा गुलाम होऊ नये, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विद्यार्थी, शिक्षण व पालकांशी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाअंतर्गत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन दिसतो, यामुळे बहुतेक मुलांचा अमुल्य वेळ वाया जात आहे. त्याचा सकारात्मक गोष्टींसाठी वापर कसा करता येईल, यावर पंतप्रधान मोदींनी शाळकरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात परीक्षांमुळे येणाऱ्या तणावाचा सामना कसा करावा, यासंदर्भात मोदींनी विद्यार्थ्यांसह पालकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात विशेष करून दिव्यांग विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींना भेटण्याची आणि त्यांना प्रश्न विचाण्याची संधी मिळाली.

तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा -
आपल्यासाठी काय महत्वाचं आणि काय नाही हे अगोदर मुलांनी समजून घेण्याची गरज मोदींनी व्यक्त केली. स्मार्टफोन आपला वेळ वाया घालवतो. अशा परिस्थितीत तंत्रज्ञान आपल्या नियंत्रणाखाली असल्यायला हवं. म्हणूनच तंत्रज्ञानाशी मैत्री करा, पण त्याचा गुलाम होऊ नका, अशा टिप्सही मोदींनी दिल्या आहेत. स्मार्टफोनवर तुम्ही किती वेळ खर्च करता, त्यातील 10 टक्के वेळ कमी करुन आपल्या आई-वडील, आजी-आजोबा आणि कुटुंबासोबत व्यतीत करा. तंत्रज्ञान तुम्हाला नेहमीच आकर्षीत करते. मात्र, त्याचा वापर तुम्ही तुमच्या मर्जीने करायला हवा, असंही मोदी म्हणाले.

देशातील तब्बल 2 हजार विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले. मानव संसाधन विकास मंत्रालयाने MyGovच्या संयुक्त विद्यमाने पाच विविध विषयांवर 9 वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या निबंध स्पर्धेतील 1,050 विद्यार्थ्यांची निवड 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमासाठी करण्यात आली होती. फेब्रुवारी-मार्च महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षांना सुरूवात होत असते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातल्या विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात संवाद साधला. 2020 पासून नवीन दशकाला सुरुवात झाली असून येणारं दशक हे देशासाठी महत्वाचे असल्याचे मोदींनी सांगितले.

Pariksha Pe Charcha 2020 | देशभरातील विद्यार्थ्यांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार | ABP Majha