Pahalgam Attack : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, पण जखमा अजूनही ताज्या; पहलगाम पुन्हा उभं राहतंय का?
Pahalgam Terrorist Attack : पहलगामच्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असून त्या हल्ल्याचा परिणाम अद्यापही पर्यटनावर दिसून येत आहे. स्थानिकांमध्ये अजूनही भीतीचं वातावरण असल्याचं दिसतंय.

Pahalgam Terrorist Attack : 22 एप्रिल 2025... पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एक काळा दिवस, जो देश कधीही विसरू शकणार नाही. पहलगामच्या सुंदर बैसरन खोऱ्यात फिरायला आलेल्या 25 निष्पाप पर्यटकांवर आणि एका स्थानिक नागरिकावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. या भ्याड हल्ल्यानं केवळ काश्मीरच नव्हे, तर अवघा देश हादरला. या भीषण दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं असलं तरी त्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. पण वर्षभरानंतचं पहलगाम कसं आहे? पहलगाममधलं पर्यटन पुन्हा सुरू झालंय का? काय आहे तिथली परिस्थिती?
या हल्ल्याचे साक्षीदार असलेले स्थानिक गाईड नजाकत अली यांनी त्या दिवसाची आठवण सांगताना भावनिक प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “मी 22 एप्रिल रोजी छत्तीसगडमधील पर्यटकांसोबत बैसरन व्हॅलीत होतो. त्यावेळी अचानक गोळीबार सुरू झाला. पर्यटक जीव वाचवण्यासाठी पळत होते. त्या क्षणी माझा शेवटचा दिवस असल्यासारखं वाटलं. पण माझ्यासोबत असलेल्या पर्यटकांचा जीव वाचवणं हीच माझी जबाबदारी होती."
Pahalgam Tourism Impact : पर्यटनावर मोठा परिणाम
एप्रिल आणि मे हा पहलगाममध्ये पर्यटनाचा हंगाम असतो. दरवर्षी या काळात बैसरन खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते. मात्र यंदा परिस्थिती वेगळी असून पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. हल्ल्यानंतरची भीती अजूनही पर्यटकांच्या मनात कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
Pahalgam Local Business : स्थानिक व्यावसायिकांना मोठा फटका
स्थानिक व्यावसायिक इम्तियाज अहमद यांनी सांगितले की, “या हल्ल्याचा सर्वाधिक फटका व्यवसायाला बसला आहे. सध्या केवळ 40 टक्के पर्यटकच पहलगामला येत आहेत. अनेकांनी कर्ज काढून व्यवसाय सुरू केला होता, मात्र आता मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे.”
Pahalgam Security Measures : सुरक्षा वाढवण्याची मागणी
हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष जावेद बुर्जा यांनी सांगितले की, या हल्ल्यामुळे पहलगाममधील पर्यटन उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. मात्र आता परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. सरकारसोबत बैठकीत बैसरन व्हॅली पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा झाली असून सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Operation Sindoor : दहशतवाद्यांविरोधात कारवाई
या हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी कठोर कारवाई करत दहशतवादी तळांवर प्रहार केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘ऑपरेशन महादेव’च्या माध्यमातून या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला. तरीही परिसरात अजूनही भीतीचं वातावरण कायम आहे.
या हल्ल्यात अनेक पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी नौशाद अली सय्यद शाह यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. त्यांच्या कुटुंबीयांना एकनाथ शिंदे यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले होते, जे त्यांनी पूर्ण केले आहे.
India Terror Incident : जखमा अजूनही भरलेल्या नाहीत
पहलगाममधील हा भ्याड दहशतवादी हल्ला काश्मीरच्या इतिहासातील एक वेदनादायी घटना ठरली आहे. वर्ष उलटूनही त्या 25 निष्पाप जीवांच्या कुटुंबीयांच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. परिस्थिती सुधारत असली तरी त्या दिवसाची आठवण आजही मन हेलावून टाकते.
ही बातमी वाचा:





















