Odisha Train Accident: ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताने  (Odisha Train Accident) सगळ्यांचा धक्का बसला आहे. रेल्वे खात्यातही या अपघातानंतर मोठी खळबळ उडाली आहे. ओडिशात अपघात झालेल्या ठिकाणी इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये (Malfunction in Interlocking System) बिघाड असल्याचा अहवाल सादर केला होता. या अहवालाला पुष्टी देणारी एक घटनादेखील घडली होती. ओडिशा रेल्वे अपघाताच्या सुरुवातीच्या तपासात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये (Electronic Interlocking System) बिघाड असल्याची माहिती समोर आली. तर, दुसरीकडे रेल्वेच्या कारभारावर चिंता व्यक्त करणारी आकडेवारीदेखील समोर आली आहे. मागील वर्षभरात देशभरात तब्बल 51 हजार वेळेस सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला असल्याचे समोर आले आहे. 


वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, रेल्वेच्या इंटरलॉकिंग सिग्नल सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड होत असल्याची माहिती आहे. रेल्वेच्या इंटिग्रेटेड कोचिंग मॅनेजमेंट सिस्टीम (ICSM) वर सिग्नल बिघाडाची आकडेवारी धक्कादायक असल्याचे 'नवभारत टाइम्स'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. 


आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात 51 हजार 238 वेळेस सिग्नलमध्ये बिघाड झाले आहेत.  एका एप्रिल महिन्यातच देशातील सर्व 17 झोनमधील रेल्वे विभागांवर सिग्नल बिघाडाच्या 4506 घटनांची नोंद झाली आहे. 


नव्याने बांधलेल्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवर एप्रिल महिन्यात 374 वेळेस सिग्नलमध्ये बिघाड झाले. दुसरीकडे, लखनौ, मुरादाबाद, दिल्ली, अंबाला आणि फिरोजपूर रेल्वे विभागाचा समावेश असलेल्या उत्तर रेल्वेमध्ये सर्वाधिक 1127 सिग्नल बिघाड झाल्याची नोंद करण्यात आली. यातील पाच झोन रेड झोनमध्ये ठेवण्यात आले आहेत. रेल्वे मंत्रालय दर महिन्याला झोननिहाय अहवाल तयार करते.


देशभरात असे झाले सिग्नल बिघाड


रिपोर्टनुसार, एका वर्षात देशभरात सिग्नल बिघाडाची आकडेवारी ही चिंता वाढवणारी आहे. मे 2022 मध्ये 5016, जूनमध्ये 4754, जुलैमध्ये 5204, ऑगस्टमध्ये 4346, सप्टेंबरमध्ये 4548, ऑक्टोबरमध्ये 4340, नोव्हेंबरमध्ये 3900, डिसेंबरमध्ये 3925, जानेवारी 2023 मध्ये 3605, फेब्रुवारीमध्ये 3181, मार्चमध्ये 3914 आणि मार्चमध्ये 3914 वेळेस सिग्नलमध्ये बिघाड झाल्याची नोंद आहे.  एप्रिलमध्ये 4506 वेळेस रेल्वे सिग्नल बिघाड झाले आहेत. 


ओडिशा रेल्वे अपघात: विजेच्या धक्क्यामुळे किमान 40 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा दावा


शुक्रवारी 2 जून रोजी ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात  (Odisha Train Accident) 278 प्रवाशांचा मृत्यू झाला. दोन एक्स्प्रेस आणि एका मालगाडीचा अपघात झाला होता. या भीषण रेल्वे अपघातामागील कारणे  समोर येत असून इतर महत्त्वाची माहिती समोर येऊ लागली आहे. या अपघातातील जवळपास 40 जणांचा मृत्यू हा विजेच्या धक्क्यामुळे झाला असल्याचे म्हटले जात आहे. हे प्रवासी कोरोमंडलमधून प्रवास करत होते.


रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये (Coromandel Express) सापडलेल्या सुमारे 40 मृतदेहांवर जखमांच्या कोणत्याही खुणा नाहीत. त्यांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बालासोर येथील रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये (GRP) एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये ही बाब नमूद करण्यात आली असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: