देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


देशातील विविध राज्यात मुसळधार पाऊस, गुजरातमध्ये पूरस्थिती; नद्यांसह धरणांच्या पाणी पातळीत वाढ


देशातील विविध राज्यात सध्या मुसळधार पाऊस (Heavy rain) कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. त्यामुळं नागरिकांचं स्थलांतर करावं लागत आहे. विशेष उत्तर भारतात पावसानं थैमान घातलं आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब हरियाणा, उत्तर प्रदेश या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच गुजरात राज्यातही पावसामुळं अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पावसामुळे धरणे आणि नद्यांची पाणी पातळी धोकादायक स्थितीपर्यंत वाढली आहे. त्यामुळं काही गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातील अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी आणि रहिवाशांची गैरसोय झाली. वाचा सविस्तर


प्रतीक्षा संपली! PM किसान सन्मान निधीचा चौदावा हप्ता 'या' तारखेला होणार जमा, कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती


पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता कधी मिळणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. पण आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. PM किसान सम्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता कधी जमा होणार याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. येत्या 27 जुलैला PM किसान चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे तोमर म्हणाले. वाचा सविस्तर


मणिपूर हिंसाचार प्रकरणात सहाव्या आरोपीला अटक; अन्य आरोपींचा शोध सुरु


मणिपूरमध्ये हिंसाचार (Manipur Violence) सुरूच आहे. राज्यातील दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी मणिपूर पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. शुक्रवारपर्यंत (21 जुलै) 5 आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, काल शनिवार (22 जुलै) सहाव्या आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सहावा मुलगा किशोरवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. 19 जुलै रोजी समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये दोन महिलांची एका समुदायाकडून विवस्त्र अवस्थेत धिंड काढण्यात आली होती. त्यानंतर महिलांवर सामूहिक अत्याचार झाल्याचाही आरोप होता.  वाचा सविस्तर


मणिपूर हिंसाचाराने भारताला जगात कलंकित केलं, याला भाजप सरकार जबाबदार : नाना पटोले


मणिपूरमध्ये जी काही परिस्थिती या दिवसात निर्माण झालेली आहे. त्यावर देशाचे प्रधानमंत्री बोलायला तयार नाहीत. मणिपूर आणि केंद्रातही भाजपचं सरकार असून आम्हाला डबल इंजिनचं सरकार द्या, म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचा शब्द कुठे आहे. मणिपूरच्या या घटनेने देशातच नव्हे तर जगात भारताला कलंक लावण्याचं पाप मनुस्मृतिच्या व्यवस्थेने केली आहे. जे सत्तेत बसलेले आहे त्यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. महिलांचा अपमान करणे महिलांच्या बद्दल कुठली आदर भावना मनात न ठेवणे. ही भावना मनुस्मृतिची होती, तीच पुढे आपल्याला भाजपच्या सत्तेत पाहायला मिळत आहे. संपूर्ण घटनेला भाजप सरकार जवाबदार आहे. ती आता संपूर्ण देशानं आणि जगानं मान्य केलेय, अशी टीका नाना पटोले यांनी मणिपूर हिंसाचारावर बोलताना केली. वाचा सविस्तर


तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांशी गैरवर्तन केले जात आहे'; सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडून चिंता व्यक्त


आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे IT क्षेत्रात नवीन क्रांती म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, भारताचे सरन्यायाधीश (CJI) डीवाय चंद्रचूड यांनी शनिवारी (22 जुलै) टेक्नॉलॉजीच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली. डीवाय चंद्रचूड म्हणाले की, सोशल मीडियाने आपल्याला सर्व वयोगटातील लोकांशी संपर्क साधण्याची परवानगी दिली आहे. पण, या नवीन संप्रेषण साधनाने ऑनलाईन गैरवर्तन आणि ट्रोलिंगसारख्या नवीन वर्तनांना जन्म दिला आहे. तसेच, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) देखील गैरवापर, चुकीची माहिती पसरवली जात आहे. आयआयटी चेन्नईच्या 60 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. वाचा सविस्तर


...म्हणून बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांना आशियाई स्पर्धांमध्ये प्रवेश, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे स्पष्टीकरण


दिल्ली उच्च न्यायालयाने कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांना आशियाई स्पर्धांच्या चाचण्यांमध्ये देण्यात आलेल्या सवलतीमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. दरम्यान भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अॅडहॉक समितीचे सदस्य भूपेंद्र सिंग बाजवा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटलं की, सवलत देण्याचे धोरण फार पूर्वीपासून आहे. तुम्हाला संकेस्थळावर याबाबत माहिती मिळेल. कोणत्याही प्रकारची दुखापत न होऊ देण्यासाठी तुम्ही चांगल्या खेळाडूंना सूट देऊ शकता असं निवड प्रक्रियेच्या नियमावलीमध्ये आहे. मागील आशियाई खेळांमध्येही काही खेळाडूंना सवलत देण्यात आली होती. वाचा सविस्तर


मेष, सिंह, तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य


आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज राशीचे लोक आपल्या मित्रपरिवाराशी काही गोष्टी शेअर करू शकतात, वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा रविवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर


लोकमान्य टिळक यांचा जन्म, आझाद हिंद सेनेच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन; आज इतिहासात


इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. प्रत्येक दिवशी काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या असतात. इतिहासात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचे स्मरण करता येते. आजचा दिवसही असाच महत्त्वाचा आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले भारतीयांच्या असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक, तर, सशस्त्र क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा आज जन्म दिन आहे. तर, आझाद हिंद सेनेच्या झाशीची राणी पलटणच्या प्रमुख कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा स्मृतीदिन आहे. वाचा सविस्तर