नवी दिल्ली : गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रोजच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णसंख्येने 40 हजारांचा टप्पा ओलांडला असून त्याचा प्रवास आता पन्नास हजारांकडे सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 46 हजार 759 रुग्णांची भर पडली असून 509 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासात 31 हजार 374 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी शुक्रवारी देशात 44 हजार 658 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 496 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. 


देशातील सध्याची कोरोनास्थिती : 



  • कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 26 लाख 49 हजार 947

  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 18 लाख 52 हजार 802

  • सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 59 हजार 775

  • एकूण मृत्यू : चार लाख 37 हजार 370

  • एकूण लसीकरण : 62 कोटी 29 लाख 89 हजार 134 डोस


केरळमध्ये विक्रमी रुग्णवाढ
देशातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे केरळमध्ये वाढलेली विक्रमी रुग्णसंख्या. केरळमध्ये काल एकाच दिवशी तब्बल 32 हजार 801 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली तर 179 जणांना जीव गमवावा लागला.


महाराष्ट्रातील स्थिती
राज्यात काल 4,654 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 301 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 55 हजार 451 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के आहे. 


राज्यात काल 170 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 51 हजार 574 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,715 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (41), नंदूरबार (2),  धुळे (18), जालना (75), परभणी (23), हिंगोली (63),   नांदेड (29), अमरावती (96), अकोला (21), वाशिम (01),  बुलढाणा (47), यवतमाळ (05), नागपूर (69),  वर्धा (5), भंडारा (8), गोंदिया (2),  गडचिरोली (29) या सतरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. 


संबंधित बातम्या :