लखनौ : काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी शनिवारी सायंकाळी हाथरसमध्ये  पीडितेच्या कुटुंबियांची भेटी घेतली. राहुल आणि प्रियंकाने पीडितेचा भाऊ, वडील आणि आईशी बंद खोलीत सुमारे एक तास संवाद साधला. यावेळी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरीही त्यांच्यासमवेत तेथे होते. या भेटीनंतर या परिवारानं उपस्थित केलेले पाच प्रश्न प्रियांका गांधी यांनी योगी सरकारला विचारले आहेत.





काय आहेत पीडित परिवाराचे  प्रश्न
1.सुप्रीम कोर्टातर्फे संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे


2.हाथरसच्या DM ना निलंबित केलं जावं, कोणतंही मोठं पद दिलं जाऊ नये


3.आमच्या मुलीच्या मृतदेहावर आमची संमती न घेता पेट्रोल टाकून जाळण्यात का आला?


4.आमची वारंवार दिशाभूल का केली जाते आहे? आम्हाला धमकावलं का जातंय?


5.आम्ही माणुसकीच्या नात्याने चितेवरचे फूल आणले, पण आम्ही कसे मान्य करायचे की तो मृतदेह आमच्याच मुलीचा होता?


डीएमला कोण वाचवत आहे? - प्रियांकांचा सवाल


पीडित परिवाराच्या म्हणण्यानुसार त्यांच्यासोबत सर्वात वाईट वागणूक डीएमनी केली आहे. त्यांना कोण वाचवत आहे? त्यांना तात्काळ निलंबित करावं. आणि सर्व प्रकरणात त्यांच्या भूमिकेची देखील चौकशी करावी. जर पीडित परिवार न्यायिक चौकशीची मागणी करत असेल तर सीबीआय चौकशीची बोंब मारत एसआयटी चौकशी सुरु आहे, असं प्रियांका गांधी यांनी म्हटलंय. यूपी सरकार झोपेतून जागे झाले असेल तर पीडित परिवाराची मागणी त्यांनी पूर्ण करावी, असंही प्रियांका यांनी म्हटलं आहे.





पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरुच राहणार - प्रियांका गांधी
पीडित कुटुंबाशी झालेल्या भेटीदरम्यान प्रियंका गांधी यांनी पीडित मुलीच्या आईला मिठी मारली आणि त्यांचं दु:ख वाटण्याचा प्रयत्न केला. पीडित कुटुंबाच्या घराबाहेर सुरक्षेचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चर्चेवेळी राहुल यांनी पीडितेच्या कुटुंबाला विचारले की तुम्हाला न्याय मिळेल असे तुम्हाला वाटते का? त्यावर तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या, असे कुटुंबीय म्हणाले,


चर्चेनंतर राहुल गांधी म्हणाले, "आम्ही पीडित कुटुंबासमवेत आहोत. सरकार त्यांना घाबरवत आहे, त्यांना धमकावत आहेत. त्यांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. यूपी सरकार सुरक्षा देण्यात अपयशी ठरत आहे. कुटुंबाला धमकावून त्यांची सही घेतली आहे. तर पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या, "पीडितेच्या कुटुंबाला न्यायालयीन चौकशी हवी आहे. कुटुंबाला मुलीचा चेहरादेखील दिसू शकला नाही. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरुच राहणार आहे."


 प्रियांका गांधींशी गैरवर्तन
उत्तर प्रदेश पोलिसांची गुंडागर्दी पुन्हा एकदा समोर आली आहे.  यूपी पोलिसांनी प्रियांका गांधींशी गैरवर्तन केल्याचा एक फोटो समोर आला आहे. कॉंग्रेस नेत्या अलका लांबा यांनी एक फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. दिल्ली आणि नोएडा प्लायओव्हरवर पोलिसांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार सुरू केली. त्यावेळी प्रियांका गांधी स्वत: रस्त्यावर उतरल्या आणि लाठीचार्ज रोखण्याचा प्रयत्न केली. यावेळी एक पोलीस प्रियंका गांधी यांना रोखण्यासाठी त्यांचे कपडे खेचताना दिसत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कृत्याबद्दल देशभर पडसाद उमटू लागले आहेत.



संबंधित बातम्या