नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढतच जात आहे. सध्या देशात 1613 कोरोनाग्रस्त आहेत. तर यापैकी 35 लोकांचा मृत्यू झाला असून 148 लोकांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. महाराष्ट्रात मंगळवारी COVID-19 चे 72 नवे रूग्ण आढळून आले. त्यानंतर महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 300 पार गेला आहे.


केरळमध्ये कोरोना व्हायरसचे सात नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर Coronaचा संसर्ग झालेल्यांची संख्या 241वर पोहोचली आहे. तमिळनाडूमध्ये 55 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 50 रूग्ण दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. त्यामुळे राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांचा आकडा 124 वर पोहोचला आहे.


देशाची राजधानी दिल्लीमध्येही 23 नवे रूग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 23 नवे रूग्ण आढळल्यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 120 झाली आहे.


देशातील इतर राज्यांबाबत बोलायचे झाले तर कर्नाटकात 101, उत्तर प्रदेशमध्ये 101, राजस्थानमध्ये 93, गुजरातमध्ये 74, मध्य प्रदेशमध्ये 66, जम्मू-काश्मीरमध्ये 55, हरियाणामध्ये 43, पंजाबमध्ये 41, आंध्रप्रदेशमध्ये 40, पश्चिम बंगालमध्ये 27, बिहारमध्ये 21, चंदिगढमध्ये 13, लढाखमध्ये 13, अंदमान निकोबारमध्ये 10, छत्तीसगढमध्ये 8, उत्तराखंडमध्ये 7, गोव्यामध्ये 5, हिमाचलप्रदेशमध्ये 3, ओदिशामध्ये 3, आसाम, झारखंड, मणिपूर, मिझोरम आणि पद्दुचेरी येथे प्रत्येकी एक एक कोरोना बाधितव आढळून आले आहेत.


पाहा व्हिडीओ : निजामुद्दीनमधून देशभरात कसा पसरला कोरोना? 24जण पॉझिटिव्ह, 334रुग्णालयात, 700क्वॉरंटाईन



आरोग्य मंत्रालयाने दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याच्या शंकेवर बोलताना सांगितलं की, 'ही वेळ कोणाची चूक आहे हे शोधण्याचा नाही, तर संसर्ग थांबवण्यासाठी काम करण्याचा आहे.'


आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 'संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचं पालन न केल्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच संसर्ग होण्याचा धोका असलेली शहरंही वाढत आहेत.'


आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करण्याचा एकमेव मार्ग सांगितला आहे. ते म्हणाले की, 'कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी सरकार शक्य तेवढे प्रयत्न करत आहे.


संबंधित बातम्या : 


कर्जधारकांसाठी 4 बँकांचा मोठा दिलासा, तीन महिन्यांनंतर हप्ते भरण्याची सूट


सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


31 मार्च | ऐतिहासिक दिवस, बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतरत्नची 30 वर्षे!


Coronavirus | असा झाला दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये कोरोनाचा फैलाव! गुन्हा दाखल करण्याचा केजरीवाल सरकारचा आदेश