नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे भारतात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 396 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील सुरत येथे एका 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. याआधी बिहार आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


बिहारमध्ये एकही कोरना बाधित नाही, परंतु एकाचा मृत्यू


आतापर्यंत कोरोनामुळे देशात सात जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये आतापर्यंत कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही. परंतु, एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पटनामधील एम्स रूग्णालयात एका 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती मुंगेर येथील मुळ निवासी असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती कतार येथून बिहारला आला होता.


एम्स येथील डॉक्टरांनुसार, सदर व्यक्तीचा मृत्यू किडनी फेल झाल्यामुळे झाली असून तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचंही आढळून आलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बिहारमध्ये अद्याप एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेला नाही.


पाहा व्हिडीओ : Coronavirus | सावधान! बाहेर फिरू नका; मुंबई, ठाण्यात संचारबंदी लागू



महाराष्ट्रात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अशातच भारतात एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच काल भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 315 होता. यामध्ये वाढ होऊन सध्या कोरोना बाधितांचा आकडा 396 वर पोहोचला आहे. देशामध्ये सर्वाधित कोरोना बाधित महाराष्ट्रात आहेत. येथे कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 63 आहे. तसेच केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 52 आहे. याआधीही महाराष्ट्रात एका व्यक्तीचा कोरोनामुळए मृत्यू झाला आहे.


31 मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊन


कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहेत. यानुसार आज मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आता जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. तर, पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेला जनता कर्फ्यूही वाढवण्यात आला होता. आज पहाटे पाच वाजेपर्यंत हा कर्फ्यू बाढवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्य शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या शहरांसह अन्य काही जिल्ह्यांचा यात समावेश आहे.


महाराष्ट्र बंद!


अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात लॉकडाऊन केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज मध्यरात्रीपासून राज्यात कलम 144 लागू होणार आहे. त्यामुळे पाचपेक्षा अधिक जण सार्वजनिक ठिकाणी फिरु शकणार नाहीत. कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या गुणकाराने वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नाईलाजाने हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.


संबंधित बातम्या : 


Coronavirus | सावधान! बाहेर फिरू नका; मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरात संचारबंदी लागू


Coronavirus | कोरोना व्हायरसची क्रोनोलॉजी सांगते तिसरी स्टेज महत्वाची


coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांची गती वाढविण्याची आवश्यकता, मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांना विनंती


Coronavirus | मुंबई लोकल पूर्णपणे बंद, देशभरातील रेल्वे वाहतूकही 31मार्चपर्यंत बंद