मुंबई : अफगाणिस्थानमध्ये तालिबानी राजवट सुरु होताच त्यांनी आपले भारत द्वेषाचे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. भारतातून होणाऱ्या साखर आणि केळी निर्यातीला मोठा फटका बसू लागला आहे . भारताशी कोणत्याही प्रकारची आयात अथवा निर्यात केली जाणार नसल्याचे तालिबानीकडून जाहीर करण्यात आल्याने आता दरवर्षी 10 ते 12 लाख टन पांढरी साखर निर्यात करणारा साखर उद्योग अडचणीत आलेला आहे.


 सध्या साखरेच्या अतिरिक्त उत्पन्नामुळे देशांतर्गत बाजारातही साखरेचे भाव पडलेले असताना अचानक अफगाणिस्तानमधील निर्यात बंद होणार असल्याने साखर उद्योगाला 3 हजार कोटी रुपयांचा फटका बसणार आहे . भारतात तयार होणाऱ्या धेडगुजरी अर्थात पांढऱ्या साखरेला श्रीलंका, अफगाण आणि इतर काही देशात मागणी असते . यात अफगाणिस्तान हे भारतातील साखर खरेदी करणारा मोठा खरेदीदार होता. आता तालिबानी निर्णयाचा फटका एका बाजूला साखर उद्योगाला बसला असला तरी आता दुसरी सुवर्णसंधी चालून आली असून आता कच्ची साखर निर्यातीसाठी राष्ट्रीय साखर महासंघाने कच्ची साखर निर्यातीच्या रूपाने एक मोठी वाट तयार करून दिली आहे. यंदा अजून हंगाम सुरु झाला नसला तरी सुरुवातीला कच्ची साखर बनवून ती निर्यात करण्यासाठी ऑर्डर घेण्याच्या सूचना महासंघाने जुलै मध्येच देशातील कारखान्यांना दिल्याने कमी उत्पादन खर्चात 3150 रुपये दराने 8 लाख टन कच्या साखरेचे करार आत्तापर्यंत झाले आहेत.


 यंदा कच्च्या साखरेचे किंग अशी ओळख असलेल्या ब्राझिलमध्ये दुष्काळ असून थायलंड मध्येही उत्पादन कमी झाल्याने भारताला कच्ची साखर निर्यात करण्यासाठी मोठी संधी मिळाली आहे.  कच्ची साखर बनवताना वाफेची आणि इतर बचतीमुळे प्रक्रिया खर्चात प्रति क्विंटल 200 रुपयांची बचत होऊ शकणार आहे. यातच पांढऱ्या साखरेपेक्षा कच्च्या साखरेला दरही जास्त मिळणार असल्याने डिसेंबर पर्यंत पहिल्यांदा कच्च्या साखरेचे करार करून ती तातडीने निर्यात करावी अशा सूचना राष्ट्रीय साखर महासंघाने दिल्या असल्याचे प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले.


 अफगाणिस्तानातील साखर निर्यात बंद झाल्याचा मोठा फटका भारताला बसला असला तरी कच्च्या साखर निर्यातीची आलेल्या सुवर्ण संधीमुळे साखर उद्योग यातून सावरू शकणार आहे. साखर महासंघाच्या भूमिकेचा फार मोठा फायदा खाजगी सोबत सहकारी साखर कारखान्यांना होणार असून आम्ही खाजगी कारखानेही कच्च्या साखर निर्यातीसाठी ऑर्डर घेऊ लागल्याचे खाजगी साखर कारखानदार अभिजित पाटील यांनी सांगितले. 


तालिबानी निर्णयाचा दुसरा फटका सोलापूर जिल्ह्यातील केळी व्यवसायाला बसला असून अफगाणिस्तानला जाणारे जवळपास 500  कंटेनरची निर्यात आता बंद होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून जवळपास 5 हजार टन  केळीची निर्यात इराण, ओमान , सौदी अरेबिया, दुबई आणि अफगाणिस्तान या आखाती देशात होत असते .  अफगाणिस्तानमध्ये सत्ताबदल होत असतानाही पाकिस्तानातील कराची बंदरात केळीचे शिप उतरल्यावर चमन बॉर्डर बंद केल्याने तुर्कम बॉर्डर मार्गे  अफगाणिस्तानात काबुल मध्ये पोचली होती . मात्र आता या मालाचे पैसे कसे मिळणार आणि या महिन्यातील तब्बल 15 कंटेनरच्या ऑर्डर रद्द झाल्याने पुढे काय हा प्रश्न केळी उत्पादकांच्या समोर उभा ठाकला आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, करमाळा, माढा , माळशिरस या भागातून आखाती देशात महिन्याला 5 हजार टन एवढी केळी निर्यात होतात. अफगाण तालिबान संघर्षामुळे 15 रुपये दराच्या केळ्यांचा  भाव आता 10  रुपयांपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्याचे महाराष्ट्र राज्य केळी बागायतदार संघाचे अध्यक्ष जाकीर मुलाणी यांनी सांगितले. आखाती देशात वर्षाला 500 कंटेनर पाठवणारे निर्यातदार किरण डोके याना आता पाठवलेल्या मालाच्या पैशाची काळजी लागून राहिली आहे . अफगाणिस्तानातील निर्यात बंद झाल्यानंतर इतर आखाती देशात निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकारने केली उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी निर्यातदार किरण डोके यांनी सांगितले. 


संबंधित बातम्या :