Coronavirus Today : देशात जीवघेण्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, धोका अद्याप टळलेला नाही. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 36 हजार 571 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 540 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्येत घट होऊन 3 लाख 63 हजार 605 वर पोहोचली आहे. जी गेल्या 150 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. 


लसीचे 57.16 कोटींहून अधिक लसीचे डोस 


देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या लसींच्या डोसची संख्या 57.16 कोटींच्या पार पोहोचली आहे. तर, गुरुवारी 48 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. लसीकरण अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर 37 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांपैकी 18-44 वयोगटातील एकूण 21,13,11,218 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर एकूण 1,79,43,325 नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. देशभरात आतापर्यंत एकूण 57,16,71,264 नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. 



राज्यात काल (गुरुवारी) 5225 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 5557 रुग्ण कोरोनामुक्त


राज्यात काल (गुरुवारी) 5 हजार 225 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 557 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 14 हजार 921 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.93 टक्के आहे. 


राज्यात काल (गुरुवारी) 154 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. एकूण 33 जिल्हे आणि महापालिका क्षेत्रात आज एकाही मृत्यूची नोंद नाही. धुळे, नंदुरबार, परभणी, अकोला, वर्धा, गोंदिया या पाच जिह्यांमध्ये आज एक कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,17,14,950 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,11,570 (12.4 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,29,047 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,614 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त


राज्यात सध्या 57 हजार 579 रुग्णावर उपचार सुरु आहेत. नंदुरबार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या शुन्यावर आली आहे. तर सर्वाधित 12 हजार 917 अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. एकूण 15 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. तर जळगाव 35, नंदूरबार- 0, धुळे- 6, परभणी - 16, हिंगोली - 76, नांदेड- 46, अमरावती 88, अकोला- 24, वाशिम - 7, बुलडाणा - 29, यवतमाळ- 16, वर्धा- 5, भंडारा- 3, गोंदिया- 2, गडचिरोली- 32 या जिल्ह्यामध्ये अक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. 


देशाच्या आर्थिक राजधानीत गेल्या 24 तासात 283 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या 24 तासात 283 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 203 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,19,158 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2,760 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 2054 दिवसांवर गेला आहे.