Gadchiroli Flood : सध्या मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. विदर्भातील गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात काही ठिकाणी भयावह स्थिती झाली आहे. जिल्ह्यातील तेलंगणाच्या टोकावर असलेल्या सिरोंचा इथं भयावह स्थिती झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून या शहराला चारही बाजूनं पाण्यानं वेढा दिला आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
 
सिरोंचा शहराला चारही बाजूनं पाण्यानं वेढा दिला आहे. मेडीगट्टा महाबंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानं सिरोंचा येथे बॅकवॉटर आलं आहे. तर दुसरीकडे वैनगंगा, प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या संगमस्थळी पाण्याची आवक सुरुच आहे. या गावाला पुराचा वेढा दिली आहे. 1986 साली अशाच पद्धतीनं पूर आला होता. जिल्ह्यात आलेल्या पुरामुळं आत्तापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील 40 गावातील नागरिकांचे स्थलांतर केले आहे.
 त्यातील 34 गावे ही सिरोंचा तालुक्यातील आहेत. सिरोंचा येथील स्थानिक प्रशासन, पूरग्रस्त नागरिकांना आधार देण्यात गुंतले आहेत. गोसेखुर्द धरणातील आवक वैनगंगा नदीत प्रवाहित  झाली आहे. जिल्ह्यातील काही मार्ग पुन्हा एकदा बंद झाले आहेत.




जूनमध्ये पावसानं दडी मारली होती. अनेक शेतकरी पावसाची वाट भगत होते. मात्र, जूनमध्ये पावसानं चांगलीच ओढ दिली होती. त्यानंतर जुलैच्या सुरुवातीपासून पावसानं जोर पकडला आहे. राज्याच्या अनेक भागात मुसळदार पाऊस कोसळताना दिसत आहे.  राज्याच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या एका टोकाला असलेल्या गडचिरोलीत पावसामुळं विदारक परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात   आलं आहे.  जिल्हा प्रशासनाकडून स्थलांतरित नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत. जिल्ह्यातील दक्षिण भागात पूर परिस्थिती जैसे थे आहे. पावसाच्या सरी अधून-मधून बरसत आहेत. वैनगंगा- गोदावरी आणि प्राणहिता नद्यांना आलेल्या पुरामुळं अनेक गावांमध्ये पाणी आहे. सिरोंचा तालुक्यातून सर्वाधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: