नागपूर :  विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी 45.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विभागात 12 तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हानिहाय अतिवृष्टी झालेल्या तालुक्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे 122.9 मिमी,  नागपूर ग्रामीण 101.1 मिमी,  उमरेड 94.5 मिमी, कुही 88.5 मिमी, नागपूर शहर 82.7 मिमी, पारशिवनी 65.1 मिमी, कामठी 64.3 मिमी, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर  येथे  83 मिमी, , गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया येथे 81.3 मिमी, मोरगांव अर्जुनी तालुक्यात 81 मिमी, गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात 78.3 मिमी तर  चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात  70.7 मिमी पावसाची नोंद झाली.


विभागात चोवीस तासांत जिल्हानिहाय सरासरी  झालेला पाऊस कंसातील आकडेवारी आजपर्यंत  झालेल्या पावसाची आहे. नागपूर 72.5 (530.6), गोंदिया  52.8 (555.5), भंडारा 42 (492.1), चंद्रपूर  38.6 (645.1),  वर्धा 34.6 (513) आणि गडचिरोली 18.2 (532.4)  पाऊस झाला आहे. सर्व आकडेवारी  मिलीमीटर परिमाणात आहेत. नागपूर विभागात  दि.1 जून  ते 15 जुलैपर्यंत सरासरी 45.8 मि. मी. पाऊस पडला.


गडचिरोलीत 10 हजार नागरिकांचं स्थलांतर


Gadchiroli:  राज्यात जुलैच्या सुरुवातीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. राज्याच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या एका टोकाला असलेल्या गडचिरोलीत पावसामुळं विदारक परिस्थिती आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 10 हजार नागरिकांचं स्थलांतर पुरामुळं करण्यात आलं आहे.  जिल्हा प्रशासनाकडून स्थलांतरित नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत. महाराष्ट्र- तेलंगणा दरम्यानचा महत्त्वाचा वाहतूक दुवा असणाऱ्या नवा कालेश्वरम पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळं तेलंगणाकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.


जुनापाणी गावात तलाव फुटला, शेतीचही मोठं नुकसान


Nagpur Rain : नागपूर ग्रामीण तहसीलमधील जुनापाणी या गावातील लघु पाटबंधारे विभागाचा तलाव आज सकाळी फुटल्याची घटना घडली. त्यामुळे गावातील 15 शेळ्या वाहून गेल्या आहेत. गावकऱ्यांनी वेळीच गावाजवळच्या उंच भागाकडे धाव घेतल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. तलावातून पाण्याचा लोंढा गावाच्या दिशेने तसेच शेतीच्या दिशेने आला. यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शेतात माती आणि चिखल सर्वत्र पसरला आहे.