प्रदेशाध्यक्षांनी परवानगी दिल्यास भाजप नेत्यांविरोधात पुरावे देईन, गिरीश महाजनांच्या आव्हानाला एकनाथ खडसेंचं उत्तर
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 07 Dec 2019 05:33 PM (IST)
या बैठकीला खडसे येणार की, नाहीत याचीही चर्चा होती. परंतु, अनुपस्थितीच्या शक्यता फोल ठरवत खडसे निमंत्रणानुसार 3.30 वाजेच्या बैठकीसाठी हजर झाले. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले की, पुरावे वगैरे आता प्रश्नच नाही. मी अस्वस्थ अथवा नाराजही नाही.
जळगाव : पक्षाच्या अध्यक्षांनी जर परवानगी दिली तर नावानिशी पुरावे जनतेसमोर मांडेन, असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज स्पष्ट केले आहे. ते भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकप्रसंगी माध्यमांशी बोलत होते. पक्षाचे उमेदवार पराभूत होण्यावरून खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच पक्ष नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव आपल्याच पक्षाच्या नेत्यांनी केल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. या संदर्भातले जर खडसे यांच्याकडे पुरावे असतील तर ते त्यांनी जाहीर करावे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले होते. त्यावर खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली. जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे उमेदवार कसे पराभूत झाले, त्यासाठी कोणी काम केले याची विश्लेषणवजा माहिती आणि तक्रारीही त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्या आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत काय घडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या बैठकीला खडसे येणार की, नाहीत याचीही चर्चा होती. परंतु, अनुपस्थितीच्या शक्यता फोल ठरवत खडसे निमंत्रणानुसार 3.30 वाजेच्या बैठकीसाठी हजर झाले. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले की, पुरावे वगैरे आता प्रश्नच नाही. मी अस्वस्थ अथवा नाराजही नाही. तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते बाहेर जनतेसमोर मांडा, असे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी म्हटले होते. यावर बोलताना खडसे म्हणाले की, माझ्याकडे नावानिशी सर्व पुरावे आहेत. परंतु, ही माहिती जनतेसमोर मांडण्यासाठी अध्यक्षांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. आमच्या पक्षाची शिस्त आहे, असेही खडसे म्हणाले. काय म्हणाले होते खडसे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील नेत्यांच्या कारस्थानामुळेच झाला आहे, असा खळबळजनक आरोप खडसे यांनी केला होता. पक्ष नेतृत्वाकडे याबाबतची तक्रार केली असून त्यावर कारवाई होईल, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली होती. भाजपने अंतर्गत राजकारणातून रोहिणी आणि पंकजा यांना पाडले. निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोड्या तर झाल्याच, पण त्यांना पाडण्याचे उद्योग झाले, असा घणाघाती आरोप खडसे यांनी केला होता. याबाबत पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी. आता पक्ष नेतृत्व त्यावर काय भूमिका घेते. काय कारवाई करते ते बघू, असंही खडसे म्हणाले होते. पंकजा आणि रोहिणी यांचा पराभव करून राज्यातील ओबीसी नेतृत्व मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. बहुजन समाजाला डावलण्यासाठीच हे कारस्थान करण्यात आलं आहे. या पराभवामुळे राज्यातील ओबीसी नेतृत्वही हरपले आहे, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली. पक्षातील कोणत्याही अंतर्गत घडामोडींना पक्ष दोषी नसतो, तर पक्ष नेतृत्व दोषी असते, असा टोलाही त्यांनी लगावला होता. Eknath Khadse | मी काय गुन्हा केला? ते अजूनही शोधतोय : एकनाथ खडसे हे ही वाचा - भाजपमधल्या 'या' नेत्यांच्या गाठीभेटी का वाढल्या?