जळगाव : पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव आपल्याच पक्षाच्या नेत्यांनी केल्याचा खळबळ जनक आरोप भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केला होता. या संदर्भातले जर खडसे यांच्याकडे पुरावे असतील तर ते त्यांनी जाहीर करावे, असे  गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.


अजित पवार यांच्या क्लिन चिट विषयावर बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे की, एसीबीने काय अॅफीडेवीट न्यायालयात दिले ते तपासून पाहावं लागेल. अजित पवार यांना काही प्रकरणात क्लिन चिट मिळाली आहे. अजून 80 टक्के प्रकरण बाकी आहेत. या अगोदर ज्या प्रकरणात अजित पवार यांना क्लिन चिट देण्यात आली. क्लीन चीट ज्या काळात देण्यात आली, त्या  काळात मंत्री पदावर नसल्याने त्यांना क्लिन चिट  देण्यात आली आहे. मात्र आज एसीबीने जी क्लिन चिट दिली आहे. ते कोणत्या प्रकरणात दिली आहे मला माहित नाही. एसीबी चौकशी करीत असली तरी मंत्र्यांचा त्यात थेट संबंध त्यात येत नसतो. ते अधिकाऱ्यांच्या मार्फत कारभार करीत असतात.

फडणवीस सरकारच्या काळात विविध विकास काम थांबविण्याचा विचार ठाकरे सरकार करीत आहे. मात्र ज्या विकास कामांना सरकारने मंजुरी सरकारने दिली आहे, ती पूर्णपणे नियमाला धरून आहेत. ठाकरे सरकारला या बाबत काही शंका असल्यास त्यांनी तातडीने चौकशी करावी. अनेक कामांना मंजुरी देताना ते आमच्या सोबत सरकारमध्ये होते आणि आता अशी भूमिका ते का घेत आहेत? कळत नाही,त्यांना काय चौकशी करायची असेल तर त्यांनी ती जरूर करावी. मात्र जनतेच्या हिताची कामे रोखू नये,त्यात सरकारचा मोठा निधी खर्च झाला आहे. अनेक कामे अंतिम टप्प्यात असल्याने ती काम पूर्ण झाली नाहीत तर राज्याच्या विकासावर त्याचा परिणाम होऊ शकतो अस महाजन यांनी म्हटलं आहे.

ठाकरे सरकारने विकास कामांना स्थगिती दिल्यास नाईलाजाने आम्हाला विधान सभेत आवाज उठवण्या शिवाय पर्याय राहणार नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे