औरंगाबाद : ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर अखेर सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात मागील दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होताना दिसत आहे. याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस झाला आहे.


दरम्यान, आज सुद्धा मुंबईच्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राने औरंगाबाद जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. तर या कालावधीत ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व यंत्रणा आणि नागरिक, शेतकरी यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापण कक्ष औरंगाबाद यांनी कळविले आहे.


यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले आणि त्यातच जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला. पण पुढे पुन्हा ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पाहायला मिळाला. तब्बल 20 दिवसांपेक्षा अधिकचा खंड झाल्याने अनेक ठिकाणी पिकं करपू लागली होती. अशात मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे या पिकांना जीवनदान मिळाला आहे. परंतु विहिरी अजूनही कोरड्या असल्याने आणखी जोरदार पावसाची अपेक्षा आहे. त्यातच हवामान विभागाने आज पुन्हा येलो अलर्ट जारी केल्याने जोरदार पावसाची अपेक्षा आहे. 


पावसाळ्यात 'या' गोष्टी करा..



  • विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

  • आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

  • आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

  • तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

  • पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.


'या' गोष्टी करु नका



  • आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका. तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

  • विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

  • उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

  • धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

  • जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून बीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nashik Rain : गोदामाई पाहुणी आली! नाशिक जिल्ह्यात पावसाची धुवांधार बॅटिंग, डोळे दिपवणार गोदावरीचे विहंगम दृश्य