मुंबई : नागपूर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकणाला जोडणाऱ्या नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. या संदर्भात आज महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून निर्णय घेतला आहे. मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. यावर आज फायनली शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याच्या निर्णयाला काही लोकांनी विरोध देखील केला होता.




शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन होऊ घातलेल्या समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव कसे देऊ शकता? बाळासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी बाळासाहेबांच्या नावाला विरोध केला आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांसाठी काम करणारे ज्योतिबा फुले किंवा पीडित शोषितांसाठी काम करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव समृद्धी महामार्गाला द्या, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला समृद्धी महामार्गाच्या नावावरुन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी 'नाव दिलं' असं म्हणत त्याचवेळी स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यास विरोध

या महामार्गास दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपचा प्रस्ताव होता. या मार्गाला अटलजींचे नाव देण्याची घोषणा आपण यापूर्वीच केली असल्याचे सांगत अशाप्रकारे दबावाचे राजकारण खेळू नका अशा शब्दांत फडणवीस यांनी सांगितलं होतं. त्यावेळी फडणवीस आणि सेना नेत्यांमध्ये झालेल्या शाब्दीक वादानंतर या महामार्गास ठाकरेंचे नाव न दिल्यास राजीनामा देण्याचा इशाराही शिवसेनेच्या मंडळींनी दिला होता.

समृद्धी महामार्गासाठी 56 हजार कोटींचा खर्च
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्प हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांशी प्रकल्पांपैकी एक होता. यासाठी सुमारे 56 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. मुंबई-नागपूर या शहरांमधील 710 किलोमीटरचा प्रवास यामुळे सहा तासांत होणार आहे. तब्बल 120 मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या 10 जिल्ह्यातील 27 तालुक्यांच्या 350 गावांमधून जाणार आहे. या प्रकल्पासाठीचे भूसंपादनाचं पूर्ण झाले असून काम प्रगतीपथावर आहे.