बुलढाणा: जिल्ह्यात पाण्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. देऊळघाट येथील एक आठ वर्षीय मुलगी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली असता तिचा पाय घसरला आणि ती 70 फुट खोल विहिरीत पडली. यात गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने जिल्हा समान्य रुग्णाल्यात भरती करण्यात आलं. मात्र उपचाराच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. हा पाण्यासाठी जिल्ह्यातील पाहिला बळी गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


देऊळघाट येथे गेल्या 70 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. 25 हजार लोकसंख्या असलेल्या देऊळघाट येथील धनगरवाडी परिसरातील अंजली भरत शेजोळ ही बालिका पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती. त्याच वेळी तिचा पाय घसरून 70 फुट खोल विहिरीत पडली. त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच विहिरीत पडण्याची ही 10 वी घटना आहे. या विहिरीत आतापर्यंत 10 जण पडले आहेत, यातील नऊ जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. दरम्यान या पाणी टंचाईवर कायमची उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी बुलढाणा अजिंठा महामार्ग आडवून धरला आहे.


या परिसरात कायमची पाणी टंचाई असून पाण्याच्या बाबतीत वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली जातात. मात्र देऊळघाट वासियांची कायमस्वरूपी तहान भागविण्यात प्रशासनाला यश मिळाले नाही. त्रस्त नागरिक आता मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहे.


वेळ पडल्यास पाणी कपातीचा निर्णय : गुलाबराव पाटील 


मागील वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं धरणात समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळं सध्या फारशी पाणीटंचाई जाणवत नाही. मात्र वाढत जाणाऱ्या कडक पडणाऱ्या उन्हामुळं पाणी पातळीत झपाट्यानं घट होत आहे. त्यामुळ यावर्षी जर वेळेवर पाऊस नाही पडला तर पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता जरी पाणीटंचाई जाणवत नसली तरी परिस्थितीनुसार पाणी कपातीचा निर्णय घेतला जाईल, असं मत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी व्यक्त केलं आहे.


नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार 


धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असूनही नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. पावसाळा लांबल्यास पाण्याचं नियोजन आतापासूनच करावे लागणार आहे. यासाठी एप्रिल महिन्यात आठवड्यातून एकवेळ पाणी कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे. एप्रिल अखेर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन मे महिन्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करावी की दोन दिवस याचा निर्णय होणार आहे. पाणी कपातीचा आराखडा राज्य सरकारला सादर केला आहे. यावर लवकरच निर्णय होणार आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या 48 टक्के पाणीसाठा आहे. हा साठा ऑगस्ट अखेरपर्यंत म्हणणेच पाच महिने पुरवायचे आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात 62 टक्के पाणीसाठा, मुकणे धरणात 59 टक्के, मालेगांवची तहान भागविणाऱ्या गिरणामध्ये 33 टक्के, दारणा धरणात 63 टक्के, पालखेड 58 टक्के पाणीसाठा आहे.