Food Poisoning In Buldhana : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा येथील मंगळवारी एका धार्मिक कार्यक्रमात वाटण्यात आलेल्या भगर आणि आमटीच्या प्रसादात जवळपास पाचशे ते साडेपाचशे लोकांना विषबाधा (Food Poisoning) झाली होती. यावेळी जवळच असलेल्या बीबी ग्रामीण रुग्णालयात अचानक 400 ते 500 रुग्ण आल्याने रुग्णालयाची क्षमता अपूर्ण पडली. 30 खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात अचानक 400 ते 500 पेशंट आल्याने अनेक रुग्णांवर अक्षरशः रस्त्यात झोपवून रात्रीच्या वेळी उपचार करण्यात आले. या सर्व घटनेचा व्हिडिओ माध्यमात प्रसारित झाल्यानंतर मुंबईतील न्यायालयीन मित्र मोहित खन्ना यांनी न्यायालयाला रुग्णालयाबाहेर रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे व्हिडिओ दाखवले. याबाबत न्यायालयाने या घटनेबाबत स्वयंप्रेरणेने जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. 


विषबाधेसारख्या गंभीर प्रकारात राज्य सरकारची रुग्णालय रुग्णांवर रुग्णालय बाहेर रस्त्यात कसे उपचार करू शकतात?, याबाबत राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला विचारणा करण्यात आली आहे. जवळपास साडेतीनशे ते चारशे रुग्णांवर अक्षरशः रस्त्यात झोपवून उपचार करण्यात आल्याचे व्हिडिओ देशभरातील माध्यमातून समाज माध्यमात झळकल्यानंतर याबाबत देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नसली, तरी मात्र एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाली किंवा चिंताजनक झाली असती तर काय केलं असतं अशी विचारणा न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. त्यामुळे आता यावर सरकार कोणते उत्तर देणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


आरोग्य केंद्रात डॉक्टर्स गैरहजर 


लोणार तालुक्यातील सोमाठाना गावात 400 ते 500 जणांना विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली होती. परिसरात असलेल्या सर्वच आरोग्य केंद्रात या रुग्णांना दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील जागा आणि डॉक्टर्स अपूर्ण पडत असल्याने बुलढाणा येथून डॉक्टरांचं पथक बोलवण्यात आले होते. विशेष म्हणजे रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने अनेकांना जमिनीवरच झोपवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. धक्कादायक म्हणजे अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स गैरहजर असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकले नसल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे काही रुग्णांची प्रकृती गंभीर झाली होती. यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळाला होता. 


व्हिडिओ प्रचंड व्हायरल...


लोणार तालुक्यातील सोमाठाना गावात 400 ते 500 जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. यावेळी रुग्णालयात देखील जागा पुरत नसल्याने अनेक रूग्णांवर चक्क रस्त्यवर झोपवून उपचार करण्यात आले होते. याच ठिकाणी दोऱ्या बांधून त्यावर सलाईन लटकावून उपचार करण्यात आले. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरला झाला होता. त्यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान, याची देखल घेत आता न्यायालयाय याचिका दाखल करण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी! बुलढाण्यात महाप्रसादातून पाचशेपेक्षा अधिक जणांना विषबाधा; रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु