Buldhana News बुलढाणा : जळगाव जामोद -बुऱ्हाणपूर मार्गावरील मानेगाव येथील पूर्णा नदीच्या पुलावरून कठडा नसल्याने मोठा अपघात (Accident News) झाला आहे. या अपघात अवघ्या सहा तासात दोन अपघात होऊन यात तीन युवकांचा दुर्दैवी (Buldhana News) मृत्यू झाला आहे. शेतातील कामे आटपुन घरी जाताना पूर्णा नदीच्या पुलावरील खड्ड्यातून दुचाकी घसरल्याने एक तरुण पुलावर, तर दुसरा 50 फुट खोल पाण्यात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना नांदुरा जळगाव जामोद रस्त्यावरील येरळी येथे घडली. तर याच ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या आसलगाव जवळ अशाच प्रकारच्या कठडा नसलेल्या पुलावरून दुचाकी नदीत कोसळल्याने एकजण जागीच ठार झाला आहे.


दुचाकी थेट पूर्णा नदीत कोसळली


गेल्या अनेक वर्षापासून जळगाव जामोद-बुऱ्हाणपूर मार्गावरील पूर्णा नदीच्या पुलांना संरक्षक कठडा नसल्याने अनेक अपघात घडले आहेत. संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेता ग्रामस्थांनी तशी मागणी देखील केली आहे. मात्र अद्याप या मागणीची पूर्तता न झाल्याने आपघातांची मालिका सुरू असल्याचे चित्र आहे. याच पुलावर संरक्षक कठडा नसल्याने तीन युवकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाला आता तरी कठडे बसावावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. रविवार, 25 फेब्रुवारीच्या दुपारी दोन वाजताच्या सुमारास आपल्या शेतीची कामे आटपून धनंजय मुकुंद (26 रा. येरळी) आणि विलास जुनारे (27, रा.येरळी) हे घरी जाण्यासाठी निघाले होते.


दरम्यान, त्यांची गाडी जळगाव-जामोद हद्दीतील पूर्णा नदीच्या जुन्या पुलावर आली असता या रस्त्यावर असलेला खड्यातून उसळली. त्यांना गाडीचा तोल न सांभाळता आल्याने आणि पूलाला संरक्षण कठडा नसल्याने धनंजय हा पुलावरून थेट नदीतील पाण्यात पडला, तर विलास पुलावरच पडला. यात दोघांनाही जबर मार बसला. ही बाब इतरांना माहिती झाल्याने त्यांनी तत्काळ धाव घेत, धनंजयला नदीपात्रातून बाहेर काढले आणि जवळील नांदुरा येथे दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, धनंजयचा उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर विलासला खामगावातील एक खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


सहा तासांत दोन अपघात, तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू


अशीच एक घटना या अपघताच्या ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या आसलगाव जवळ घडली आहे. कठडा नसलेल्या पुलावरून नदीत एक तरुण कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, मृत तरुणाचा मृतदेह पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला. मात्र या युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही. दुचाकीच्या क्रमांकावरुन पोलीस या युवकाची ओळख पटवण्याचा प्रयत्नात असून पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र फक्त सहा तासांत याच मार्गावर पुलाला संरक्षक कठडा नसल्याने दोन अपघातात तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोबतच या पूलांवर तत्काळ सुरक्षा कठडा बांधण्याची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या