बुलडाणा : बुलडाण्यातील बुलडाणा अर्बन रेसीडेन्सी क्लबचं हिरवंगार लॉन... या लॉनवर सुरु असलेल्या 'त्या' कार्यक्रमात तिचे डोळे आपल्या आयुष्याचा हिरो झालेल्या 'राणादादा'च्या आठवणींच्या अश्रूंनी ओसंडून वाहत होते. कार्यक्रम लॉनच्या हिरवळीवर असला तरी राणाच्या जाण्याने तिच्या आयुष्याचं पार वाळवंट झालं होतं. कार्यक्रमाच्या गर्दीत 'राणा' दिसत नसला तरी त्याच्या आठणींच्या 'चंदना'चा दरवळ 'रवी'ने जपला होता. रविकांत यांनी आपल्या मनात राणांच्या मैत्रीचा जपलेला गहिवर त्यांच्या वाळवंट झालेल्या आयुष्यात माणुसकी आणि बंधुप्रेमाचा गारवा निर्माण करणारा होता. कार्यक्रमाच्या प्रत्येक क्षणाला किरण वहिनींना राणाच्या स्मृती व्याकूळ करत होत्या. तितक्यात 'तो' क्षण' आला. गाडी अर्थातच 'लोकरथा'च्या पुजनाचा... माईकवरुन अनाऊंसमेंट झाली की, 'किरण वहिनी' आणि शांताबाई चंदन या 'लोकरथा'चं प्रथम पूजन करतील'. किरण वहिनी आणि शांताकाकू व्यासपीठाच्या बाजूला ठेवलेल्या गाडीजवळ गेल्या. किरण वहिनी डबडबलेल्या डोळ्यांना गाडीचं पूजन करत होत्या. या कार्यक्रमाच्या आधी झालेला पाऊस थांबलेला होता. मात्र, या हृदयस्पर्शी प्रसंगानंतर तो कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून बरसत होता...अश्रूंच्या रुपाने. 


किरण या विधवेच्या हाताने गाडीचं प्रथम पूजन करण्यात आलं होतं. त्या रविकांत तुपकर यांच्या शेतकरी चळवळीतील त्यांचे दिवंगत विश्वासू सहकारी राणा चंद्रशेखर चंदन यांच्या पत्नी होत्या. अगदी तिशीतील राणाचं मागच्या वर्षी एका आजाराने निधन झालं होतं. याच राणाच्या विधवा पत्नीच्या हाताने रविकांत तुपकरांना बुलढाणाकरांनी लोकवर्गणीतून दिलेल्या चारचाकी 'लोकरथा'चं पूजन करायला लावलं. शेतकरी चळवळ आणि त्यातील तमाम कार्यकर्त्यांना बळ आणि दिशा देऊ पाहणारा एक अनोखा सोहळा काल (12 जून) बुलडाण्यात झाला. सध्याचा काळ राजकारण आणि चळवळींच्या अधोगतीचा... यातील उदाहरणं आणि काळ डोळ्यासमोर असताना या सोहळ्याने चळवळींसाठी आश्वासकतेचं नवं बिजारोपण केलं आहे. या सर्वार्थाने वेगळ्या ठरलेल्या कृतज्ञता सोहळ्याचा प्रत्येक क्षण संवेदनेच्या कृतार्थेने भरलेला आणि भारलेला ठरला. त्यात शेतकरी, सामाजिक आणि राजकीय चळवळीला वेगळी उंची देऊ पाहणाऱ्या अनेक आदर्शांची पेरणीही झाली. 


बुलढाणाकरांच्या लोकवर्गणीतून रविकांत तुपकरांना चारचाकी 'लोकरथ' प्रदान 
रविकांत तुपकर.... राज्याच्या शेतकरी चळवळीच्या पटलावर काम करणारा बुलढाणा जिल्ह्यातला रांगडा अन लढवय्या कार्यकर्ता... पश्चिम महाराष्ट्रातील ऊस आंदोलन, दूध आंदोलन, विदर्भातील सोयाबीन, कापूस आंदोलनातून तुपकरांनी आपल्या आक्रमक बाण्याने व्यवस्थेला नमायला भाग पाडलं. मात्र, शेतकरी प्रश्नांची सोडवणूक, आंदोलनानिमित्ताने अख्खा महाराष्ट्र पालथा घालावा लागत असलेल्या रविकांत यांच्याकडे अगदी कालपर्यंत स्वत:ची चारचाकी गाडी नव्हती. आतापर्यंत मित्रांनी दिलेल्या गाड्यांनीच त्यांच्या चळवळीचं 'सारथ्य' केलं होतं. रविकांतसारख्या संवेदनेने श्रीमंत असलेल्या 'फाटक्या' कार्यकर्त्याला सांभाळणं, जपणं ही आपल्या समाजाचीच जबाबदारी आहे, या विचारांतून बुलढाण्यातील सर्वच क्षेत्रातील अराजकीय मंडळी एकत्र आली. अन् यातूनच समोर विचार आला तो लोकवर्गणीतून त्यांना चारचाकी वाहन घेऊन देण्याचा. हे वाहन लोकवर्गणीतून देण्यात येणार असल्याने त्याला 'लोकरथ' असं नाव देण्यात आलं. कारण, रविकांत यांच्यासारखे कार्यकर्ते टिकले तरच ही चळवळ टिकेल. अन् चळवळ टिकली तरच आपला शेतकरी टिकेल, असा विचार 'लोकरथ' घेण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या आयोजन समितीने मांडला. 


गेल्या महिनाभरापासून हा 'लोकरथ' घेण्यासाठी लोकवर्गणी गोळा करण्याच्या चळवळीचा प्रारंभ झाला. पाहता संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यासह अनेक सर्वसामान्य लोकांनी यात आपला लहानात लहान वाटा दिला. शेतकरी, शेतमजूर, हातगाडीवाले, रिक्षावाले, सायकल दुरुस्ती करणारे यांसह अनेकांनी यात आपला आर्थिक वाटा देत सहभाग नोंदवला. आयोजन समिती आणि रविकांत तुपकरांनी या लोकवर्गणीत कोणत्याही परिस्थितीत राजकीय नेते, कंत्राटदार, शासकीय अधिकारी, रेती व्यावसायिक यांच्याकडून लोकवर्गणी न स्वीकारण्याचा निर्णय अखेरपर्यंत कसोशीने पाळण्यात आला. 


लोकवर्गणीच्या निर्णयाला दिला होता तुपकरांनी विनम्रपणे नकार
लोकवर्गणीतून चारचाकी वाहन घेऊन देण्याच्या निर्णयाला रविकांत तुपकरांनी विनम्रतेने नकार दिला होता. परंतु, मित्रमंडळ आणि आयोजन समितीच्या लोकरेट्यासमोर अखेर त्यांना नमतं घेत होकार द्यावा लागला. विशेष म्हणजे लोकवर्गणी जमा करणे, कार्यक्रमाचं आयोजन, पाहुण्यांना निमंत्रणं या सर्व बाबींची विशेष कल्पना तुपकरांनाही नव्हती. फक्त कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित रहा, असा प्रेमळ हट्ट आयोजन समितीने त्यांना केला होता. 


मान्यवरांच्या भाषणांनी सोहळ्याला मिळाली वैचारिक उंची
महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक आणि लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल तीन तास रंगलेल्या या कार्यक्रमाला पद्मश्री पोपटराव पवार, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, सप्तखंजेरीवादक कीर्तनकार सत्यपाल महाराज, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिव ओमप्रकाश शेटे, माजी मंत्री आमदार महादेवराव जानकर, साहित्यिक आणि संपादक संदीप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 


यावेळी बोलताना संदीप काळे यांनी तुपकर हे असामान्य व्यक्तिमत्वाचे धनी असल्याचं सांगितले. ओमप्रकाश शेटे यांनी लोकसंग्रह, चाहत्यांचे प्रेम, दांडगा जनसंपर्क ही तुपकरांची संपत्ती असून ही संपत्ती अशीच अगणित वाढत राहिल अशी खात्री व्यक्त केली. राधेश्याम चांडक यांनी हा सोहळा अभूतपूर्व असून यानिमित्त एका नवीन राजकीय पर्वाला सुरुवात होत असल्याचे सूचक विधान केले. पोपटराव पवार यांनी शेतकऱ्यासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या तुपकरांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केल. विठ्ठल वाघ यांनी लोक वर्गणीतून मिळालेल्या वाहनामुळे रविकांत तुपकर यांची चळवळ आणखी गतिमान होईल तसेच रविकांत तुपकर चाहत्यांनी दाखविलेला विश्वास आपल्या कामातून सिद्ध करतील, असा आशावाद व्यक्त केला. 


आपल्या कृतज्ञतापर मनोगत व्यक्त करताना रविकांत तुपकर हे पार गहिवरुन गेले होते. लोकवर्गणीतून मिळालेले हे वाहन आणि सोहळा आजवरचा सर्वात मोठा सन्मान असल्याचे या शेतकरी नेत्याने सांगितलं. भविष्यात आपण जगणार आणि मरणार ते जनसामान्य लोक, चळवळीसाठी आणि त्यातील निस्वार्थ कार्यकर्ते अन् चाहत्यांसाठीच असं तुपकर म्हणाले. त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावळी दिली. ऐन पावसाळी वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, चाहते आणि शेतकऱ्यांची अलोट गर्दी उसळली होती.


आमदार महादेवराव जानकर यांची सरप्राईज' उपस्थिती
माजी मंत्री आमदार महादेवराव जानकर यांचं रविकांत तुपकरांवर अक्षरश: लहान भावासारखं प्रेम. कार्यक्रम ऐन बहरात आलेला असतांना कार्यक्रमस्थळी आमदार जानकरांच्या सरप्राईज एंट्रीने तुपकरांसह सर्वांना आनंदाचा सुखद धक्का बसला. यावेळी आमदार जानकरांनी रविकांत तुपकरांना या अनोख्या जनप्रेमासाठी अभिनंदन करत भविष्यातील वाटचालीत खंबीरपणे पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली.


अलिकडे शेती, माती आणि शेतकऱ्यांचे प्रश्नं कायम पोरके झाल्याची भावना बळीराजामध्ये बळावत चालली आहे. शेतकरी आणि शेती प्रश्नांचं सारं आभाळ फाटलेलं आहे. अशा अंधाऱ्या वाटेवर प्रकाश पेरणारे काही प्रकाशाची बेटं असलेले शेतकरी कार्यकर्ते ही चळवळ जगवण्याचा आणि जागवण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकारण आणि चळवळीच्या अधोगतीच्या काळात बुलढाणाकरांनी चळवळीला गती देण्यासाठी पाडलेला पायंडा हा कौतुकास्पद अन् तेवढाच आश्वासक म्हणावा लागेल.