Bhandara News : ज्या दिवशी संविधान बदललं जाईल त्या दिवशी देशाचं विभाजनाला सुरुवात होईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे. आज हा देश एकसंघ आणि बलाढ्य होत चालला आहे. त्याच एकमेव कारण म्हणजे, या देशाचं संविधान. संविधान चांगलं की वाईट, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. BR Ambedkar) त्यांच्या शेवटच्या भाषणात म्हणजेच, जेव्हा संविधान देशाला सुपूर्द केलं, तेव्हा भाषणात सांगितलं, असल्याचे त्यांनी म्हटले. संविधान चांगलं की वाईट, हे संविधान राबविणारे हात हे चांगलं की वाईट यावर अवलंबून आहे. त्यामुळं संविधान वाईट म्हणणारे लोकं, त्यांचे हात किती वाईट आहेत यावर संविधान आहे. जर हात चांगले असतील तर, संविधान चांगले आहे. त्यामुळं अशा लोकांच्या आणि आज जे काही जाती धर्माचं राजकारण करून अख्या देशात दुहीच राजकारण केल्या जातंय, तेढ निर्माण केली जातेय. त्याच्यामुळं देश कधीही एकसंघ राहणार नाही, त्यामुळं आता लोकांनी सुद्ध विचार करावा असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले. या देशात जातीच्या राजकारणामुळं आणि जाती एकत्रित नको असणाऱ्या अभिमानामुळं त्यांचे एवढे अपमान झालेत. तरीही, त्यांनी कधी देशाचा द्वेष केलेला नाही. त्यांनी प्रथम भारतीय आणि शेवटपर्यंत भारतीय असं वक्तव्य करणारे बाबासाहेब आणि त्यांची तीच भावना संविधानाने दिसते आणि त्यामुळं संविधान बदलणं हा मूर्खपणा होईल, असा टोला बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू तथा रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकरांनी (Anandraj Ambedkar)  यांनी भाजपला लगावला आहे.  


आरक्षणाचं षडयंत्र महाराष्ट्रात खेळलं जातंय - आनंदराज आंबेडकर


मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आता दुर्दैवी पद्धतीनं हाताळला जातोय. मराठ्यांना कुणबी मध्ये घालणं खरं तर मूर्खपणा आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं हे माझ धोरण आहे. पूर्वीचे असलेले मोठे मोठे जमीनदार आज कुटुंब वाढल्यानं अल्पभूधारक झाले आहेत. त्यांच्या मुलांना शिक्षणात आणि नोकऱ्यात आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे, असे त्यांनी म्हटले. पण ते मराठा म्हणून मिळालं पाहिजे. आज मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीत टाकून ओबीसी आणि मराठा असं 50 टक्के वर्ग होतो. 50 टक्के पेक्षा जास्त म्हणजेच ओबीसी 50 टक्के आणि 18 ते 20 टक्के मराठा समाज आहे. अशा 70 टक्के वर्गाला तुम्ही 27 टक्के आरक्षण देतायत. 13 टक्के एससी आणि 7 टक्के एसटी असं 20 टक्के आणि यां सर्वांना 50 टक्यांमध्ये बसवून आपण राहिलेल्या 10 टक्के वर्गासाठी ज्याला सुवर्ण  म्हंटल्या जातं त्यांना तुम्ही 50 टक्के अप्रत्यक्षपणे आरक्षण करताय. हे जे षडयंत्र महाराष्ट्रात खेळलं जातंय, त्याला आमचा विरोध असल्याची भूमिका आनंदराज आंबेडकर यांनी मांडली. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावर सुरू असलेल्या आरक्षणावर बोलत होते.


राजकीय दबाव आणण्यामुळं लोकशाही धोक्यात येतं- आनंदराज आंबेडकर


देशात दिल्लीच्या सरकारपासून ईडी, सीबीआय, कुठं कुठं न्यायपालिका जिथं जिथं शक्य असेल तिथं, हे जे काही हस्तक्षेप चाललेलं आहे. यात स्वाभिमानी माणसं त्या हस्तक्षेपाला मानत नाही. जे स्वाभिमानी नसतात तेच हस्तक्षेप मानून घेतात. या सर्वांचं अभिनंदन करतोय की त्यांनी राजकीय हस्तक्षेपाला आपला राजीनामा देवून सरळसरळ आव्हान दिलेलं आहे. सरकारनं सुद्धा कुठलंही प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय दबाव आणनं योग्य नाही. त्यामुळं लोकशाही धोक्यात येते. लोकशाहीची जी या देशात उज्वल परंपरा आहे, त्याला कुठं तरी बाधा येईल, असा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी भाजपवर लावला. मागासवर्गीय आयोग समितीच्या अध्यक्षांसह चार सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्यावर आनंदराज आंबेडकर बोलत होते.


पूर्वीच्या आणि आजच्या काँग्रेसमध्ये जमीन अस्मानचा फरक


राजकारणात आजचा शत्रू उद्याचा मित्र असतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगायचा झाल्यास, सातत्य हा गाढवाचा गुणधर्म आहे. त्यांनी तथागत गौतम बुद्धांचा परिवर्तनवादी विचार या देशामधील बाबासाहेबांच्या अनुयायांना दिला. त्यामुळं विचारांचं परिवर्तन होत राहते. आज दुश्मन असलेली माणसं उद्या मित्र होतील. हे सर्व राजकारणात नक्कीच होतात, हे पाहतोय. बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितलं, ती काँग्रेस आज टिकली आहे का? हा महत्वाचा प्रश्न आहे. काँग्रेसचे अनेकवेळा तुकडे झालेत. त्यामुळं आता जी काही काँग्रेस आज राहिलेली आहे, तिच्यात आणि पूर्वीच्या काँग्रेसमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं म्हणजे, त्या काळचं भाष्य आणि आजच्या काँग्रेसची परिस्थीती ही सर्व पाहून आजच्या देशाच्या परिस्थितीला गरज कशाची आहे. त्यानुरुप वागणं ही काळाची गरज असल्याची भूमिका आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली. ॲड.प्रकाश आंबेडकर हे भाजपा विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या महाविकास आघाडीत सामील होऊ इच्छित असून यावर ते बोलत होते.