Beed Dam Water Storage Update: वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होऊन बीड जिल्ह्यातील (Beed District) 143 पैकी 9 प्रकल्प कोरडे पडले असून 33 प्रकल्पातील जलसाठा (Water Storage) हा जोत्याखाली गेला आहे. तर उर्वरित 101 जलप्रकल्पामध्ये केवळ 23 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर बीडमध्ये भविष्यात पाणीटंचाईच संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या धरणातील पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. बीड जिल्ह्यातील तापमान हे 40 ते 42 अंशावर गेल्यामुळे तर तीन महिन्याच्या कालावधीमध्ये 35 टक्के पाण्याचे बाष्पीभवन झालं असून, झपाट्याने जलसाठ्यातील पाणी कमी होऊ लागल्याने जिल्ह्यातील धरणाचा पाणीसाठा 23 टक्के वर येऊन ठेपला आहे.

एकीकडे यंदा पावसाचे प्रमाण कमी असणार असल्याचा अंदाज वर्तवला जात असतानाच, पावसाळ्याच्या तोंडावरच पाणीटंचाईच्या संकटाची चाहूल लागली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात अवकाळी तसेच गारपीट झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. या दोन महिन्यांत ढगाळ वातावरण असल्याने फार मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले नाही. मात्र त्यानंतर मे महिन्यात तापमान कमाल 40 ते 42 अंशांच्या दरम्यान राहिले. यामुळे बाष्पीभवन झपाट्याने होऊ लागले आहे. फेब्रुवारीमध्ये जिल्ह्यातील 143 लहान- मोठ्या धरणांत 58.37 टक्के पाणीसाठा होता. आता हाच पाणीसाठा 23 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. 

बीड जिल्ह्यातील प्रकल्पांची परिस्थिती...

बीड जिल्ह्यातील एकूण सात प्रकल्प जोत्याखाली गेले असून, या प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के आहे. मोठ्या प्रकल्पात गणला जाणारा शिरूर तालुक्यातील बेलपारा, लघु पाटबंधारे प्रकल्पामधील बीड तालुक्यातील मौज, ईट, बेलोरा, वडवणी तालुक्यातील मन्यारवाडी, मैंदा, गेवराई तालुक्यातील खडकी, शिरूर तालुक्यातील खोकरमोहा, खराबवाडी, वारणी, निमगांव, हिरवसिंगा, शिरूर तालुक्यातील नारायणगड, आष्टी तालुक्यातील बेदरवाडी साठवण तलाव, पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका, पाचंग्री, दासखेड, मुंगेवाडी, मध्यम प्रकल्पातील कांबळी, पाटोदा तालुक्यातील इंचरणा, सौताडा, भुरेवाडी, वसंतवाडी, आष्टी तालुक्यातील किन्ही, वडगाव, केळ, बेलगाव, मातकुळी, पारगाव नंबर 2, सिद्धेवाडी ल.पा., धामनगाव, पांढरी व जळगांव प्रकल्प जोत्याखाली आहेत. विशेष म्हणजे मागील तीन महिन्यांच्या कालावधीत 35 टक्के पाण्याचे बाष्पीभवन झाले असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. 

जिल्ह्यातील पाणीसाठा..

प्रकल्प  एकूण पाणीसाठा  मृतसाठा  उपयुक्त पाणी 
माजलगाव-परळी विभाग  229.000 142.000 27.88
बीड विभाग  7.389 2.813 17.49
परळी विभाग समन्वय  42.052 12.579 37.03
मध्यम प्रकल्प  15.759 5.716 21.97
लघु प्रकल्प  5.483 4.383 2.53
सर्व एकूण गोदावरी, कृष्णा खोरे  359.055 189.873465 23.63

इतर महत्वाच्या बातम्या: 

Nashik News : उन्हाची तीव्रता वाढू लागली, पाणीसाठा घटू लागला, नाशिक जिल्ह्यात अवघा 39 टक्के पाणीसाठा