Beed  News : मराठवाड्यात (Marathwada) आधी अतिवृष्टी आणि त्यानंतर आता अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) गारपीट पाहायला मिळत आहे. दरम्यान बीड जिल्ह्याला (Beed District) देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यामध्ये शनिवारी दुसऱ्यांदा मोठ्याप्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असून, मोठ्याप्रमाणात फळबागांचा नुकसान झाला आहे. तर घरांची देखील पडझड झाली आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि गारपिटीमुळे आष्टी तालुक्यातील नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे. 


बीडच्या आष्टी तालुक्यातल्या अनेक भागात शनिवारी अवकाळी पावसासह गारपीट झाली. अरवहिरा गावच्या शिवारात मुसळधार गारांचा पाऊस झाला. सायंकाळच्या वेळी अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली आणि त्यातच गारांचा पाऊस सुरू झाला. पाऊस एवढा मुसळधार होता की, सर्वत्र अंधार पसरला होता. या मुसळधार पावसाची आप बीती सांगताना गावकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं. डोळ्या देखत पीक मातीमोल झाली आहे. त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. 


याच अरवहिरा गावचे राजेंद्र रामगुडे यांच्याकडे दोन एकर डाळिंबाची बाग आहे. काही दिवसात या बागेची तोडणी त्यांना करायची होती. मात्र मुसळधार पाऊस आणि त्यातच कोसळणाऱ्या गारांमुळे काही क्षणांमध्ये या बागेचं होत्याचं नव्हतं झालं. पाच लाख रुपये खर्च करून त्यांनी ही बाग हाताच्या फोडाप्रमाणे जपली. मात्र वादळी वारा आणि पावसामध्ये संपूर्ण झाडांची फळगळती झाली असून, झाडांवर पाला देखील शिल्लक राहिला नाही. त्यामुळे त्यांचं 15 ते 16 लाख रुपयांचे नुकसान झाल आहे. 


घरावरील पत्रे उडून गेले 


या मुसळधार पावसामुळे फक्त एका गावातच नुकसान झालं नाही. तर आष्टी तालुक्यातील दहा ते बारा गाव या मुसळधार पावसामुळे बाधित झाले आहेत. यामध्ये फक्त फळबागाच नाही तर घरांची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. तर कुठे जनावरांना देखील यामुळे दुखापत झाली आहे.


अस्मानी संकटाचा सामना करायचा कसा


आष्टी तालुक्यामध्ये झालेल्या शेतीच्या नुकसानीची जिल्हा प्रशासनाकडून पाहणी करण्यात येत असून, त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात येणार असल्याच सांगण्यात आल आहे. मात्र आठवड्याभरात तीन वेळा बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. विशेष म्हणजे निसर्गाचा खेळ किती क्रूर आहे बघा, म्हणजे ज्या भागांमध्ये मुळात पाऊसच कमी पडतो त्याच भागांमध्ये इतकी मोठी गारपीट झाली. जणू हा भाग दुष्काळी मराठवाड्यात येतो का जम्मू कश्मीरमध्ये येतो असा प्रश्न पडतोय. सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजासमोर आता या अस्मानी संकटाचा सामना करायचा कसा असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Photo : बीडमधील अरणविहीरा येथे गारपिटीचा तडाखा, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान