Agriculture News : पावसाने ओढ दिल्यानंतर बीड (Beed) जिल्ह्यातील सोयाबीन पिकाच्या अग्रीम पीक विम्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांच्या समन्वयामुळं हा प्रश्न मार्गी लागला आहे. उर्वरित राहिलेल्या 13 मंडळांसह जिल्ह्यातील संपूर्ण 86 मंडळांमध्ये सोयाबीन पिकास अग्रीम 25 टक्के पीक विमा लागू करण्यात आला आहे. 


धनंजय मुंडे यांची भूमिका महत्त्वाची


ज्या ठिकाणी पावसाच्या खंडामध्ये सदोष किंवा नियमात न बसणारे खंड दाखवण्यात आले होते, त्या मंडळांचाही समावेश यात करण्यात आला आहे. पूर्वी मंजूर 73 आणि नव्याने करण्यात येत असलेले 13 अशा सर्वच मंडळांमध्ये आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अग्रीम 25 टक्के पिक विम्याचा आधार मिळणार आहे. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, विद्या वेत्ता तसेच वेगवेगळ्या उपग्रहांच्या पावसाची नोंदणी केलेल्या अहवालांच्या आधारे केवळ खंड यावर अवलंबून न राहता विविध निकषांचा सुयोग्य वापर करुन हा अग्रीम पीकविमा मंजूर करून घेण्यासाठी धनंजय मुंडे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली असून जिल्हा प्रशासनाने ही त्यास पूरक प्रतिसाद दिला आहे. 


सर्वच जिल्हा प्रशासनाने अग्रीम पीक विम्याबाबत पाठपुरावा केला


जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांच्यासह सर्वच जिल्हा प्रशासनाने अग्रीम पीक विम्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यामुळं हा निर्णय तातडीने होऊ शकला आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रथमच उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणारे कृषी विद्यापिठातील उच्च पदस्थ अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाचा समन्वय घडवून आणला. हा प्रयत्न आगामी काळात पीक विम्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.


बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये पावसाचा खंड


बीड जिल्ह्यातील विशेषतः सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत पावसात दीर्घकालीन खंड पडल्यामुळे शेतकरी संकटात आले आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये पावसाच्या खंडाने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने अंतरिम दिलासा म्हणून शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळवून देण्यासाठी महसूल, कृषी आणि पिक विमा कंपनीने एकत्रित सर्वे करुन अहवाल सादर करावा. तसेच अग्रीमे विमा देण्याचे निर्णय घ्यावा असे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. 


दरम्यान, या बैठकीत शास्त्रज्ञ डॉ. डाखोरे यांनी अल्प काळात उपग्रह डेटा आधारित विविध निर्देशांक, जमीन ओलावा निर्देशांक, पीक वाढ निर्देशांक, तापमान फरक, बाष्पीभवन याची परिपूर्ण माहिती सादर केली. डॉ. सुर्यवंशी, डॉ. गरुड यांनी कायिक वाढ ही उत्पादक वाढ नसल्याचे निदर्शनास आणले. शेतकरी प्रतिनिधी काकडे, चौरे यांनी शेतातील परिस्थिती, उत्पादन घट याची माहिती दिली. तसेच उपविभागीय कृषी अधिकारी बीड आणि अंबाजोगाई गर्जे आणि शिनगारे यांनी कृषी विद्यापीठ, क्षेत्रिय सर्व्हे आणि तपासण्या या आधारे त्याचे अधीन असलेले अनुक्रमे 9 व 4 महसूल मंडळांबाबत लिखित अहवाल देऊन उत्तम सादरीकरण केले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture news : बीड जिल्ह्यातील 87 मंडळात 25 टक्के अग्रीम पीकविमा मंजूर, कृषीमंत्री मुंडेंच्या सुचनेचे प्रशासनाकडून पालन; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा