एक्स्प्लोर
दोन लाखांची कर्जमाफी हे बुजगावणं, राज्यमंत्री बच्चू कडूंचं वक्तव्य
तुरीच्या आयात-निर्यातीच्या धोरणामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. हे नुकसान अगणित असून त्याचा अंकात विचार ही करू शकत नाही. हे सांगतानाच त्यांनी शेतकऱ्यांना दोन लाखाची दिलेली कर्जमाफी ही बुजगावणं असल्याचं म्हणत आपल्याच सरकारला टोला लगावला आहे.

पिंपरी : दोन लाखांची कर्जमाफी हे बुजगावणं आहे, असं वक्तव्य महाविकास आघाडी सरकारचे राज्य मंत्री बच्चू यांनी केलं आहे. आत्तापर्यंत आम्हाला (शेतकऱ्यांना) किती लुटलं गेलं याचा हिशोब सरकारने दिला तर त्यांच्याकडेच आमचे पैसे निघतील, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले. पुण्याच्या आळंदी येथे वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. तूर डाळीला हमीभाव देणं आणि ते जाहीर करणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे. पण केंद्र ते काम करत नाही अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली. तुरीच्या आयात-निर्यातीच्या धोरणामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. हे नुकसान अगणित असून त्याचा अंकात विचार ही करू शकत नाही. हे सांगतानाच त्यांनी शेतकऱ्यांना दोन लाखाची दिलेली कर्जमाफी ही बुजगावणं असल्याचं म्हणत आपल्याच सरकारला टोला लगावला आहे. यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, कायद्यावर कायदे येत आहेत पण शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा मात्र हे केंद्र सरकार आणू शकत नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला उद्देशून म्हणताना हिंदुत्व सोडलं नसेल तर ते एनआरसीला समर्थन करतील, असं वक्तव्य केलं होतं. त्याला उत्तर देताना बच्चू कडूंनी राज्यातील प्रश्नांचे प्राधान्यक्रम ठरवण्याचा सल्ला भाजपला दिला. अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी वसतिगृहाच्या निकृष्ट अन्नाचा विषय दोन दिवसात निकाली काढण्याचे आदेश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केल्याने बच्चू कडूंनी ठेकेदारावर कारवाई करण्याचं ही आश्वासन दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना हिंदूंच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण देऊ नये असं पत्रक काढणाऱ्या संघटनेला गांभीर्याने घेऊ नका, असं आवाहन राज्यमंत्री बच्चू कडूंनी केलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मनस्तापामुळे सुट्टीवर गेले असं वक्तव्य करणारे भाजप आमदार नितेश राणे हे विचार करण्याजोगते नाहीत. त्यामुळं राणेंना काही अर्थ नाही, त्यांनी आत्तापर्यंत किती पक्ष बदलले. हे पाहता त्यांच्या शब्दांचा आपण किती विचार करावा, असा टोला बच्चू कडूंनी लगावला.
Before You Go
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर






















