Nitin Gadkari : अलीकडे नवी कार विकत घेताना ग्राहक तिचं मायलेज, स्पीड, जागा यापेक्षा अधिक कार प्रवासासाठी किती सुरक्षित आहे, हे पाहतात. बदलत्या जीवनशैलीमुळे आता अपघातही खूप वाढले आहेत. त्यामुळे आता वाहनांची सेफ्टी अधिक महत्त्वाची झाली आहे. दरम्यान आज राज्यसभेत भारतातील वाहनांच्या सेफ्टीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. राज्यसभा सदस्य केटीएस तुलसी यांनी भारतात वाहनांचं सेफ्टी रेटींग नेमकं कसं आहे, याबाबत विचारणा केली. ज्यावर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण दिलं.


सद्या जगभरातील कोरिया, अमेरिका अशा विविध देशात त्यांचे कार्ससाठी विविध सेफ्टी फिचर्स आहेत. त्यानुसार भारतही आपले सेफ्टी फिचर्स सेट करत असून आता नव्याने तयार होणाऱ्या विविध कार्समध्ये महत्त्वाचे बदल करुन सुरक्षिततेवर अधिक लक्ष दिल्याचं गडकरींनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी सेफ्टी रेटिंग वाढवण्यासाठी काही महत्त्वाचे बदल गाड्यांमध्ये केल्याचं सांगितलं.


या गोष्टींमुळे सेफ्टी रेटिंग वाढवणार   



  • 1 ऑक्टोबर, 2022 नंतर तयार होणाऱ्या वाहनांत 6 एअरबॅग्स अनिवार्य असणार असल्याचं गडकरी यांनी सांगितले. या एअरबॅग्समुळे कार अपघातात होणारे मृत्यू मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं गडकरींनी सांगितलं. जवळपास वर्षभरात 25 हजार मृत्यूंची संख्या या एअरबॅग्समुळे कमी होऊ शकते, असंही गडकरी यावेळी म्हणाले.    

  • कारची मजबूती आणि आतील प्रवाशांची सेफ्टी यासाठी कार्सची विविध प्रकारे क्रॅश टेस्ट करण्यात येणार असून यामुळे अपघातांमध्ये अधिक सुरक्षितता मिळणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

  • 3 पॉंईट सिट बेल्ट तसंच सिट बेल्ट अलर्ट हे सेफ्टी फिचर्सही कारमध्ये देण्यात आले आहेत.

  • याशिवाय बोनेटचं डिझाईनही अशाप्रकारे बनवण्यात येईल, ज्याने अपघातात पादचाऱ्यांना कमी दुखापत होईल.

  • तसंच अँटी लॉक ब्रेक सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबलिटी कंट्रोल या फिचर्समुळेही कारचं सेफ्टी रेटिंग अधिक वाढणार आहे.


जुन्या कार्सचं काय?


दरम्यान गडकरींच्या या सेफ्टी रेंटिंगच्या स्पष्टीकरणानंतर राज्यसभा सदस्या रुपा गांगुली यांनी जुन्या कार्सच्या सेफ्टीचं काय? असा महत्त्वाचा प्रश्न विचारला. पण यावर उत्तर देताना तूर्तास तरी जुन्या कारमध्ये हे सेफ्टी फिचर्स टाकणं तांत्रिकदृष्ट्या अवघड असल्याचं यावेळी गडकरींनी सांगितलं. 


हायड्रोजन कारने गडकरी संसदेत


वाढतं प्रदूषण तसंच इंधनाचे वाढते भाव म्हणून इलेक्ट्रीक कार्सचा पर्याय आता समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध कार कंपनी टोयाटोने ग्रीन हायड्रोजनवर इंधनावर (Hydrogen based Fuel Cell Electric car) चालणारी भारतातील पहिली वहिली कार समोर आली होती. या मिराई (Toyota Mirai) कारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर आज संसदेत जाताना गडकरींनी याच कारने प्रवास केला. शुभ्र पांढऱ्या रंगाच्या या कारमधून गडकरींनी प्रवास केला असून महागलेल्या इंधनावर हायड्रोजन इंधनाचा पर्याय ठरेल, असा दावा गडकरींनी यावेळी केला. प्रदूषण नियंत्रणासाठी हायड्रोजन इंधन वापराच्या पर्यायाची पडताळणी करण्यासाठी गडकरींनी हा प्रवास केला. 



हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



Car loan Information:

Calculate Car Loan EMI