औरंगाबाद : मुलगी जन्माला आली म्हणून अनेक मातांनी आपल्या पोटच्या गोळ्याला रस्त्यावर, कचरा कुंडीत फेकल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. मात्र, औरंगाबादमधील एका महिलने बाळ जन्माला यायच्या आधीच त्याची विक्री करायचा घाट घातल्याची निंदनीय घटना उघडकीस आली. गर्भातील बाळ विक्री करणार असल्याची जाहिरात एका आईने नातेवाईकांच्या मदतीने फेसबुकवर टाकली. या जाहिरातीत बाळाची किंमत पाच लाख रुपये ठेवण्यात आली होती. ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी गर्भवती महिलेसह तिच्या भाऊजींना ताब्यात घेतलं आहे.


बाळंतपणाच्या सातव्या महिन्यात या महिलेला पोलीस स्टेशनच तोंड पहावं लागलं आहे. ते सुद्धा तीने केलेल्या निंदनीय घटनेमुळं, ही महिला तिच्या भाऊंजीसोबत औरंगाबादच्या वाळूज परिसरात राहते, ती सात महिन्यांची गर्भवती आहे. ती नवऱ्यापासून आता दूर झाली आहे. त्यामुळं पुन्हा लग्न करायचं असेल तर बाळ अडचण ठरू शकतं म्हणून तिनं आणि तिच्या भाऊजींनी पोटातील बाळ विकण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी थेट फेसबुकची मदत घेतली. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी एक बाळ दत्तक घेण्याचा ग्रुप शोधला, लोकांचे नंबर मिळवले आणि बाळाची किंमत ठेवली 5 लाख. मात्र, हा सगळा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला आणि पोलिसांनी हा सगळा प्रकार उघड करीत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. पोटातच असलेल्या बाळाची विक्री करण्याचा हा घाट पाहून पोलिसही उदविग्न झाले. अपत्य जन्माला येणे ही निसर्गाची सर्वाती मोठी देणगी मानली जाते. मात्र, पोटातच असलेल्या बाळाची विक्री करणं आणि तेही आईकडून हे धक्कादायक आहे. त्यामुळं असल्या प्रकरणात कठोर कारवाई केली तरच या मानसिकतेच्या लोकांवर अंकूश बसेल.


पालघरमध्ये घडलेल्या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


लोकांना काय झालंय?
अनेकवेळा मुलाच्या हव्यासापोटी अनेक नकोशी अवैध मार्गाने गर्भातच मारुन टाकल्याचे प्रकार घडत आहेत. तर, अनेक ठिकाणी मुलगी जन्माला आली म्हणून तिला रस्त्यावर अथवा कचराकुंडीत फेकल्याची बातम्या समोर येतात. बऱ्याचवेळा अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाच्या नशीबीही अशा अडचणींना सामोरे जावे लागते. सरकार आणि प्रशासन यासाठी मोठ्या प्रमानात जनजागृती करत आहे. मात्र, यासाठी समाजमनाने जागे होणंही तितकंच महत्वाचं आहे. औरंगाबादच्या घटनेने तर कहरचं केलाय. जे बाळ आणखी पोटातचं आहे, त्याचीच विक्री करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे लोकांना झालायं तरी काय? असा प्रश्न समाजातून उपस्थित होत आहे.


Lockdown 2 | मुंबईत आजपासून अंशतः लॉकडाऊन; टोलनाक्यांवर लांबच लाबं रांगा | ABP Majha