Aurangabad : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता विकोपाला जाऊन पोहोचला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे दौरा करतात तिथे शिवसेना-राष्ट्रवादीकडून त्या जागेच शुद्धीकरण केलं जात आहे. दरम्यान यावर बोलतांना रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचे डोकं काम करत नसून, त्यांचे डोके गोमुत्राने धुतलं पाहिजे असं वक्तव्य भुमरे यांनी केलं आहे.एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. (Sandipan Bhumre On Ambadas Danve And Chandrakant Khaire)


गेल्या महिन्याभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा औरंगाबादचा दौरा केलाय. पहिल्या दौऱ्यात त्यांनी पैठण येथे सभा घेतली. मात्र याचवेळी ज्या बिडकीन गावात मुख्यमंत्री शिंदेंनी रॅली काढली तिथेच शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून रस्ता शुद्ध केला. यावरच बोलताना भुमरे यांनी अंबादास दानवे आणि खैरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विरोध करणं विरोधकांचे कामच आहे. मात्र अशा प्रकारे विरोधकांनी गोमूत्र शिंपडने योग्य नाही. एकनाथ शिंदे यांची पैठणला झालेल्या सभेमुळे, दानवे आणि खैरेंच डोकं चालत नाही. तर या दोघांचं डोकं काम करत नसून, त्याला गोमूत्राने शुद्ध केलं पाहिजे अशी टीका भुमरे यांनी केली आहे.


आदित्य ठाकरे ही त्याच रस्त्याने आले....


पुढे बोलताना भुमरे म्हणाले की, एकनाथ शिंदे ज्या रस्त्यावरून आले त्या रस्त्यावर गोमूत्र शिंपडून विरोधकांनी रस्ता शुद्ध केला. मात्र त्याच रस्त्यावरून आदित्य ठाकरे सुद्धा आले होते. बहुतेक त्यामुळेच शिवसैनिकांनी रस्ता शुद्ध केला असावा असा खोचक टोलाही भुमरे यांनी लगावला.


जावई असणं गुन्हा आहे का?


भुमरे यांच्या जावयाने ब्रह्मगव्हाण जलसिंचन योजनेचे काम रजिस्ट्री करून स्वतःच्या नावावर घेतल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी अंबादास दानवे यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाला उत्तर देताना भुमरे म्हणाले की, माझ्या जावयाने लग्नापूर्वीच काम घेतलं होतं. जावयाने एकही बिल उचलेलं असेल तर दाखवून द्या, कारण ते काम दोन वर्षांपासून बंदच आहे. त्यामुळे जावई असणं काही गुन्हा आहे का? असा प्रश्नही भुमरे यांनी उपस्थित केला.


माझ्या विरोधातील कागदपत्र राष्ट्रवादीने पुरवले...


माझ्या जावयावर आणि माझ्यावर ज्या कामामुळे आरोप करण्यात येत आहे त्याचे कागदपत्र अंबादास दानवे यांना राष्ट्रवादीच्या लोकांनी पुरवले. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार खुद्द औरंगाबाद मध्ये होते. मात्र राष्ट्रवादीच्या लोकांनी आरोपाचे कागदपत्र त्यांना न देता दानवेंना दिले. कारण त्यांना सुद्धा माहितीय दानवे आणि खैरेंच डोकं काम करत नाहीये, असा टोलाही भुमरे यांनी लगावला.


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादीकडून दुग्धाभिषेक, गद्दारांच्या हस्ते अनावरण झाल्याचा आरोप


हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनी औरंगाबादमध्ये राजकारण; मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या कमी वेळेवरुन विरोधकांचा हल्लाबोल