Aurangabad Crime News Updates  : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या निवृत्त सहसंचालकाचे चाकूचा धाक दाखवून कारमधून आलेल्या पाच ते सहा जणांनी  अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अपहरणकर्त्यांनी या माजी अधिकाऱ्याला सोडण्यासाठी तब्बल सुमारे 2 कोटी 80 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. मात्र औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी (Aurangabad Rural Police News) चक्र फिरवत अखेर अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकत ताब्यात घेतले आहे. विश्वनाथ राजळे (62, रा. सिडको एन 7) असे अपहरण झालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात नोकरीला असलेले राजळे चार वर्षांपूर्वी निवृत्त झाले. दरम्यान शनिवारी ते आपल्या बीड रोडवरील छत्रपती संभाजीराजे कारखान्याजवळील इब्राहिमपूर शिवारातील शेतात आले होते. शेतात बांधलेल्या फार्म हाऊसवर ते थांबले असतानाच तिथे अनोळखी पाच ते सहाजण आले. तसेच राजळे यांना चाकूचा धाक दाखवीत बळजबरीने कारमध्ये बसविले.


पाच ते सहाजणांनी राजळे यांना चाकूचा धाक दाखवत बळजबरीने कारमध्ये बसवत असल्याचे त्यांच्या सालगड्याने पाहिले. मालकाला अज्ञात लोकं घेऊन जात असल्याचं पाहून त्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यामुळे राजळे यांचे अपहरण करण्यासाठी आलेल्या चार-पाच जणांनी त्याला मारहाण केली. तसेच त्याला एका खोलीत डांबून ठेवलं. 


पोलीसांनी तपासाची चक्रं फिरवली..


सालगड्याला कोंडून ठेवल्यावर अपहरणकर्ते फरार झाले. त्यानंतर काही वेळाने सालगड्याची पत्नी तिथे आली. त्यावेळी सालगड्याने तिला आवाज दिल्यावर तिने दरवाजा उघडला. सालगड्याने लगचेच याची माहिती राजळे यांच्या कुटुंबातील सदस्य आणि पोलिसांना दिली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवली. त्यानंतर पोलिस पथकाने दावलवाडी (ता. बदनापूर ) शिवारातील एक पेट्रोल पंपावर रात्री 9 वाजेच्या सुमारास सापळा लावत राजळे यांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले. ज्यात विकास भगवान खरात (22), पांडुरंग विष्णू पडूळ (22), रोहित दीपक भागवत (18), बबनराव वाघ (44), राहुल बबन गुंजकर (29), दीपक भागवत (44) अशी आरोपींचे नावे आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या