Aurangabad News : बातमी औरंगाबादकरांची चिंता वाढवणारी असून, औरंगाबाद जिल्ह्यात स्वाइन फ्लूमुळे 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती शनिवारी समोर आली. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा विळखा वाढतांना पाहायला मिळत आहे. तर आतापर्यंत स्वाइन फ्लूमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली असून, यावर वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात स्वाइन फ्लूमुळे एका 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती शनिवारी समोर आली. पैठण तालुक्यातील या तरुणीला 30 ऑगस्ट रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 1 सप्टेंबर रोजी शहरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. कोरोनानंतर आता जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा विळखा वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह नागरिकांची चिंता वाढली आहे. या आजारामुळे आतापर्यंत शहरातील एक व ग्रामीणमधील एक अशा दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 


नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन


जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा विळखा वाढत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. निदान झालेल्या स्वाइन फ्लू रुग्णांसाठी टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. तर मनपाच्या 5 केंद्रांमध्ये लसही उपलब्ध आहे. नागरिकांनी कोरोनाप्रमाणे आताही काळजी घेण्यावर भर द्यावा, असे आवाहन मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे.


चिंता वाढली...


1 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील स्वाइन फ्लूची एकूण रुग्णसंख्या 34 असतांना हा आकडा आता 37 वर पोहचला आहे. यातील पाच रुग्ण इतर जिल्ह्यातील असून, ज्यात 2 रुग्ण जालना जिल्ह्यातील आहे. 37 रुग्णांपैकी 26 रुग्ण बरे झाले असून, अजूनही 9 रुग्णांवर उपचार सुरु आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूने सर्वसामन्य नागरिकांसोबतच प्रशासनाचीही चिंता वाढवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.


महत्वाच्या बातम्या....


Aurangabad: औरंगाबादकरांची चिंता वाढली; पाच दिवसांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली


Aurangabad: विदेशी जातीचे वराह मोकाट, मालकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल