Yashomati Thakur मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आमदारकी आणि काँग्रेस पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Congress) मोठा राजकीय भूकंप झाला असल्याचे चित्र आहे. आगामी निवडणुकांच्या पूर्वीच राज्याचा राजकारणात मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहे. दरम्यान, आज महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Congress) मोठा भूकंप झाला आहे.


अशातच आता भाजप आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या वक्तव्यानंतर मोळी खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ तीवसा मतदारसंघाच्या आमदार तथा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर ह्या सुद्धा भाजपच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा, आमदार रवी राणा यांनी एबीपी माझाशी बोलताना केला होता. यावर आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी आपले मत स्पष्ट करत रवी राणांच्या दाव्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. 


ते स्वतः दल बदलू


आमदार रवी राणा आणि नवनीत राणा हे नुसते वायफळ बडबड करत राहतात. ते स्वतः दलबदलू आहेत. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधारे निवडून आले आणि आज दुसऱ्यांवर सातत्याने बोलत असतात. त्यांनी स्वतःच्या घरात आणि स्वतामध्ये  झाकून बघितले पाहिजे.  त्यांना आम्हाला बोलण्याची काही गरज नाही. आम्ही आहोत तिथे आहोत आणि आयुष्यभर सर्वधर्म समभाव या विचारासाठी आमचे संपूर्ण आयुष्य गेलं तरी चालेल. आम्ही आहोत त्याच ठिकाणी राहणार आहोत, असे देखील आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या.


श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग


जे गेले ते का गेले, हा मोठा प्रश्न आहे. मात्र त्यामागील एक कारण म्हणजे, राज्यात आणि केंद्रात श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग आणि घाबरवण्याचे काम सध्या चालू आहे.  ज्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांना देखील घाबरवल्या जात आहे. भाजपमध्ये आज जे लोक आहेत ते भाजपचे कमी आणि बाकी इतर पक्षाचे जास्त झालेले आहेत. इतकी भयभीत अवस्था आहे की, काहीही करायचं मात्र सत्तेत राहायचं. असे सध्याचे चित्र आहे. कदाचित म्हणून अशोक चव्हाण हे गेले असावेत. मात्र आम्ही आहोत आणि आहोत तिथेच आहोत आणि आयुष्यभर सर्वधर्म समभाव या विचारासाठी, संविधानासाठी, सेक्युलर भारतासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस सोबत असल्याचे देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या. 


काय म्हणाले होते रवी राणा?


यशोमती ठाकूर यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना रवी राणा म्हणाले, तीवसा मतदारसंघाच्या आमदार तथा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या सुद्धा भाजपच्या संपर्कात आहे. मात्र भाजपने त्यांना थांबायला सांगितलं आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघ सुद्धा खाली होणार आहे, असे देखील रवी राणा म्हणाले. 


पुढे आमदार रवी राणा म्हणाले,  अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे 10 ते 15 आमदार संपर्कात आहे.  मी या आधी पण सांगितलं होतं की, काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार आहे.  15 फेब्रुवारीला अमित शहा हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. तेव्हा तुम्हाला आणखी मोठे धक्के पाहायला मिळेल. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये मोठे धक्के पाहायला मिळेल, राहिलेले पक्ष सुद्धा खाली होणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या