अहमदनगर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी शांतता रॅली काढली आहे. ही रॅली 12 ऑगस्टला अहमदनगरमध्ये (Ahmednagar) दाखल होणार आहे. या रॅलीला मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

राज्य सरकारने तातडीने सगेसोयरेंची अधिसूचना जारी करून मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातून या रॅलीची सुरुवात केली आहे. या शांतता रॅलीला लाखो मराठा बांधवांची गर्दी होत आहे. या गर्दीला संबोधित करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत.

प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी

आता मनोज जरांगे यांची शांतता रॅली 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरासह उपनगरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रॅलीमुळे होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आजच्या दिवसाची तासिका इतर दिवशी भरून काढवीत, असेही आदेशात म्हटले आहे. 

Continues below advertisement

मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा 

मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज सांगलीहून कोल्हापूरमध्ये पोहोचली. पाटील यांचे कोल्हापुरात जोरदार स्वागत करण्यात आले. जरांगे पाटील यांनी दसरा चौकामध्ये शाहू महाराज यांना अभिवादन केल्यानंतर आगीत भस्मसात झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली. शिवाजी चौकामध्ये झालेल्या जाहीर सभेत जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून तसेच कोल्हापूरच्या स्थानिक मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, सरकारला अजूनही आम्ही गोडीने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सांगत आहोत. मात्र शेवटचा पर्याय म्हणून विधानसभेला सगळे उमेदवार पाडावे लागतील. आता विनंती करून सांगत आहे, नाहीतर नंतर सगळेच पडतील असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

'छगन भुजबळ जिथं प्रचाराला जातील ती जागा आम्ही पाडणार', मनोज जरांगेंचं विधान; अजित पवार म्हणाले...

नारायण राणेंनी मानले मनोज जरांगेंचे आभार, सांगितलं मराठवाड्यात कधी येणार