Ahmednagar News  : सध्या नाशिकसह (Nashik) जिल्हाभरात कांदा काढणीची कामे सुरु असून नगर (Ahmednagar) जिल्ह्यातही अनेक भागांत उन्हाळी कांदा काढणीला आला आहे. अनेक मजूर कांदा काढणी (Onion farm) करत असून अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजपर्यंत उत्तर भारतात आढळत असलेली कांदा पिकातील कीड महाराष्ट्रात आढळली असून अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात कांद्याच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या डोळ्यात अचानक अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यातील वळण गावात शेतातील कांदा काढत असताना मजुरांच्या डोळ्यात जळजळ होत असल्याचं लक्षात आल्यानंतर नेत्रतज्ञांकडे तपासणी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मजुरांच्या डोळ्यात अळी तयार होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे मोलमजूरी करणारे मजूर भयभीत झाले असून सुरूवातीला ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तीथे कोणताही उपचार न मिळाल्याने मजुरांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतात काम करताना माशीची अंडी डोळ्यात उडाल्याने हा प्रकार झाल्याचं शास्त्रज्ञ सांगत असून कांदा कापणीच्या वेळी काळजी घेण्याच आवाहन करण्यात येतंय.


दरम्यान, या सगळ्या प्रकारा नंतर कृषी विद्यापिठाचे (Rahuri Agri University) शास्त्रज्ञ घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी सदर घटनेची पाहणी केली आहे. शेतात काम करत असताना कांदा माशीने जमीनीत दिलेली अंडी मातीबरोबर डोळ्यात उडाल्याने ही अळी डोळ्यात तयार झाल्याचं कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ भारत पाटील यांनी म्हटलं आहे. माशीची कीड ही फक्त कांदा आणि लसून या दोनच पिकांवर असते. ती जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा कांद्याच्या पाकळीत आपले अंडी घालत असते. तीच अंडी कांदा काढत्यावेळी मजुरांच्या डोळ्यात गेली आणि त्यातूनच अळ्या निघण्याचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र यामध्ये शेतक-यांनी घाबरून जाण्यासारखे काहीही नसून काढणीच्या वेळी काळजी घेण्याची गरज असल्याच स्पष्ट केल आहे. ही कांदा पिकातील कीड यापूर्वी उत्तर भारतात आढळायची परंतु आता अशी कीड महाराष्ट्रात दिसून आली असून यातून घाबरून न जाता काढणीच्या वेळी योग्य ती खबरदारी घेणं महत्वाचं आहे..


शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण 


दरम्यान सद्यस्थितीत जिल्ह्यातील अनेक मजूर इतर ठिकाणी जाऊन कांदा काढत आहेत. मात्र असा प्रकार घडल्याने हे मजूरही भयभीत झाले आहेत. सुरूवातीला ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिथे कोणताही उपचार न मिळाल्याने मजुरांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार अतीशय दुर्मीळ असून एकाच वेळी पंधरा वीस जणांना याची बाधा झाली आहे. वेळीच उपचार केले तर इतर व्याधी होत नाहीत असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.