Health Benefits of Pani Puri : पाणीपुरी... कदाचितच कोणी असेल ज्याला पाणीपुरी (Pani Puri) आवडत नसेल. पाणीपुरी हे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. अनेकदा रस्त्यावरून जाताना एखादा पाणीपुरीचा (Golgappa) ठेला दिसला तर पाय तिथेच थबकतात. बऱ्याचदा पाय आपसूकच तिकडे वळतात. सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे अनेकजण पाणीपुरी खाणं टाळतात. पण तुम्हाला माहितीये का? जिभेचे चोचले पुरवणारी पाणीपुरी आरोग्यासाठीही तितकीच फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यापासून ते मानसिक आरोग्य राखण्यापर्यंत आरोग्याच्या अनेक समस्यांवर पाणीपुरी रामबाण उपाय ठरते. 


पाणीपुरी खरंच आरोग्यासाठी घातक आहे का? याचा विचार तुम्ही केलाय का? पावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे अनेकदा आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. असावेळी जर तुम्ही बाहेरचे पदार्थ खाणं टाळत असाल, तर तुम्ही हा पदार्थ घरीही तयार करून खाऊ शकता. जाणून घ्या पाणीपुरीचे आरोग्यदायी फायदे...




झटपट वजन कमी करण्यासाठी गुणकारी 


वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. बाजारातील औषधांपासून ते घरगुती उपायांपर्यंत अनेक उपाय केले जातात. तुम्हीही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर तुम्ही पाणीपुरीचा डाएटमध्ये समावेश करु शकता. पण पाणीपुरी खाताना फक्त एक काळजी घ्या. रव्याच्या पुऱ्या न खाता पीठाच्या पुऱ्यांचा वापर करा. पाणीपुरीचं पाणी तयार करताना जलजीरा आणि मीठ असलेल्या पाण्याशिवाय पुदीना, लिंबू, हिंग आणि कैरी घालून पाणी तयार करा. त्यामुळे तुमचं वाढणारं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. 




माऊथ अल्सरपासून सुटका


शरीरातील उष्णता वाढल्यामुळे माऊथ अल्सरची (Mouth Ulcer) समस्या उद्भवते. पाणीपुरी तयार करताना वापरलेल्या काही पदार्थांमुळे माऊथ अल्सरची समस्या दूर होते. पाणीपुरीसाठी वापरलं जाणारं तिखट पाण्यात जलजीरा आणि पुदिन्यासारख्या गोष्टी वापरल्या जातात. जलजिऱ्यातील तिखट आणि पुदिन्यातील आंबट पदार्थांमुळे माऊथ अल्सरपासून सुटका मिळवण्यास मदत होते. 




अॅसिडिटीवर फायदेशीर 


अनियमित जीवनशैलीमुळे अनेकांना अॅसिडीटीचा (Acidity) सामना करावा लागतो. अॅसिडीटीपासून सुटका मिळवणायची असेल तर तुम्हीही पाणीपुरी खाऊन पाहा. पण फक्त रव्याच्या पुऱ्यांऐवजी पिठाच्या पुऱ्या तयार करा. त्याचबरोबर पाणीपुरीसाठी पाणी तयार करताना जलजिऱ्यासोबतच पुदीना, कैरी, काळं मीठ. काळीमीरी, जिऱ्याची पूड आणि साध मीठं घालून पाणी तयार करावं. या सर्व पदार्थांमुळे अॅसिडिटी काही वेळातच दूर होण्यास मदत होईल. 


मूड रिफ्रेश होण्यास मदत 


रोजच्या धावपळीतून शरीर थकून जातं. त्याचसोबत आपला मूडही खराब होतो. अशावेळी मूड रिफ्रेश करण्यासाठी काहीतरी थंड पिण्याची अथवा खाण्याची इच्छा होते. अशावेळी पाणीपुरी उत्तम उपाय ठरतो. पाणीपुरीचं पाणी तयार करताना त्यामध्ये जलजीरा, सैंधव मीठ आणि पुदीन्याचा वापर करतात. यांमुळे मुड रिफ्रेश होण्यास मदत होते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :