Green Chilly Benefits : भारतीय जेवणात चव हिरव्या मिरचीमुळे जास्त येते. जेवणात तडका, तिखटपणा आणण्यासाठी मिरचीचा वापर केला जातो. मिरची जशी जेवणाची चव वाढवते. तशीच ती अनेक आजारांवरही रामबाण उपाय आहे. जर तुम्ही रोज मिरचीचे सेवन केले तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील.


हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 6 असते. याशिवाय त्यात कॅप्सेसिन, कॅरोटीन, क्रिप्टोक्सॅन्थिन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे अँटी-ऑक्सिडंट असतात जे फुफ्फुस आणि हृदयाच्या आजारांपासून संरक्षण करतात. अमीनो ऍसिड, फॉलिक ऍसिड आणि ऍस्कॉर्बिक ऍसिड असतात जे पाचक एन्झाईम वाढवतात आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.


'या' समस्यांमध्ये फायदेशीर


हाय बीपी : हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन आढळते, म्हणूनच ज्यांना बीपीची समस्या आहे त्यांनी हिरव्या मिरच्यांचे सेवन केले पाहिजे. याबरोबरच मिरचीतील सायट्रिक अॅसिड रक्त पातळ करण्याचे काम करते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित राहते. 


त्वचेसाठी फायदेशीर : हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे ते त्वचेला अधिक कोलेजन तयार करण्यास मदत करते. हिरवी मिरची त्वचा निरोगी आणि चमकदार बनविण्यात मदत करते.


लोहाची कमतरता दूर करते : हिरव्या मिरचीमध्ये लोह भरपूर असते, त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. ज्या लोकांच्या शरीरात लोहाची कमतरता असते त्यांना थकवा जाणवतो. अशा लोकांनी त्यांच्या आहारात हिरव्या मिरचीचा समावेश करावा. 


डोळ्यांसाठी फायदेशीर : हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए सारखे पोषक घटक आढळतात, जे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. हे वृद्धत्वापासून संरक्षण करते आणि मोतीबिंदू सारख्या डोळ्यांच्या आजाराचा धोका कमी करते. 


सांधेदुखीमध्ये फायदेशीर : हिरव्या मिरचीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. संधिवात आणि ऑस्टियोआर्थराइटिसच्या रुग्णांसाठी याचा वापर खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे हाडांची सूज आणि वेदना कमी होतात.


रक्ताभिसरण सुधारते : हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे संयुग आढळते ज्यामुळे ती तिखट लागते. मिरची खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि नसांमध्ये रक्तप्रवाह जलद होतो. हिरव्या मिरच्यांचे नियमित सेवन केल्याने रक्ताभिसरण संतुलित राहते.


पचन सुधारते : हिरवी मिरची अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे, हिरव्या मिरचीमध्ये आहारातील फायबर्स मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल